दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणाऱ्या तपासयंत्रणांचे मुख्यमंत्र्यांना कौतुक वाटत नाही का?

मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा अर्थ काय लावायचा? 

Updated: Aug 31, 2018, 08:08 PM IST
दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पकडणाऱ्या तपासयंत्रणांचे मुख्यमंत्र्यांना कौतुक वाटत नाही का? title=

मुंबई: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही तपासयंत्रणांचे कौतुक का केले नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा पाच वर्षांनी का होईना शोध लागला. मात्र, मुख्यमंत्र्यांना एकदाही पोलिसांचे कौतुक करावेसे वाटले नाही. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा अर्थ काय लावायचा, असे विखे-पाटलांनी विचारले. 

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयच्या हाती दाभोलकर हत्याप्रकरणाचेही काही महत्त्वपूर्ण दुवे लागले. त्यानंतर तपास प्रक्रियेला वेग आला आहे. एटीएस आणि सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणात काही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केल्याची कबुलीही दिली आहे.