युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Updated: Feb 25, 2022, 06:35 PM IST
युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर title=
फोटो सौजन्य ANI

Russia Ukraine War : युक्रेन-रशियातील युद्ध चिघळत चालल्यानं महाराष्ट्राचंही टेंशन वाढत चाललंय.  महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. यातल्या 320 विद्यार्थ्यांचा संपर्क झाल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. राज्यातल्या अनेक शहरांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नंबर आणि ईमेल जाहीर केला आहे. लँडलाईन नंबर 02222027990, मोबाईल क्रमांक 9321587143 आणि ईमेल controlroom@maharashtra.gov.in जाहीर केले आहेत. या नंबरवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकार या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सर्व मदत करत आहे, त्यांना जी मदत हवी आहे ती देण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार उपाययोजना करत आहेत, युक्रेनमधून विमानाने आणणं शक्य नाही, त्यामुळे बाजूच्या देशातून आणता येणं शक्य असेल तर आम्ही तयारी दर्शवली आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावी अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना मोफत आणण्याची घोषणा केली आहे, ते न झाल्यास आम्ही आणण्यास तयार आहोत, अशी माहितीही वडेट्टीवार यांनी दिली आहे. 

रत्नागिरीतले आठ विद्यार्थी अडकले

रत्नागिरीतलेही आठ विद्यार्थी खारकिव्हमध्ये अडकले आहेत. खारकिव्हमध्ये परिस्थिती चिघळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सतत होणारे बॉम्ब हल्ले, रणगाडे आणि धडाडणा-या तोफांच्या आवाजामुळे विद्यार्थ्यी आणखीनंच घाबरले आहेत.  मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या या विद्यार्थ्यांकडे केवळ तीन- चार  दिवस पुरेल एवढाच अन्नधान्याचा साठा आहे.

या विद्यार्थ्यांना सध्या सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. शहराजवळ्या बंकर्स आणि मेट्रोच्या भुयारांध्ये सध्या हे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. तातडीनं मायदेशात नेण्यात यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांनी भारत सरकारकडे केलीय.

नांदेडच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा अनुभव
भारतात परतण्यासाठी निघालेल्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना 48 तासापेक्षा जास्त वेळ बसमध्येच प्रवास करावा लागला. त्यामध्ये नांदेडच्याही काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चर्नीव्हीस्ट येथून किव्ह विमानतळाकडे विद्यार्थी निघाले होते. मात्र विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं विद्यार्थ्यांना परतावं लागलं. या विद्यार्थ्यांना आता रोमानियामार्गे भारतात आणलं जाईल.