भाजपवर 'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर...

दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. 

Updated: Nov 28, 2019, 10:56 AM IST
भाजपवर  'सामना'च्या अग्रलेखातून ताशेरे, दिल्लीपुढे गुडघे टेकले नाहीत तर... title=

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी दिल्लीश्वरांपुढे गुडघे टेकले नाहीत, ढोंगाशी हातमिळवणी केली नाही, असे 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. महाराष्ट्र धर्माचे सरकार स्थापन होत असल्याची स्तुती करण्यात आली आहे. आजचा 'सामना विशेष' आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे 'सामना'चं संपादकपद उद्धव ठाकरेंनी सोडले आहे. 'सामना'ची जबाबदारी कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊतांकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळे आजचा 'सामना' प्रथमच ठाकरे विरहीत सामना आहे.

दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचा कारभार सुरळीत चालावा आणि तिन्ही पक्षांमध्ये एकसुत्रता असावी यासाठी यूपीएच्या धर्तीवर राज्यातही समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते असतील अशी माहिती आहे. महाराष्ट्र विकासआघाडीच्या बैठकीत समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असून शपथविधी पूर्वी  या समितीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

मराठी माणूस आळशी नाही. तसेच तो फाजील अपेक्षाही ठेवत नाही.  मात्र, त्याला खोटेपणाची आणि ढोंगाची चीड आहे. त्याच चिडीतून आमचे सरकार आले आहे. महाराष्ट्र धर्म हा व्यापक आहे. त्याच महाराष्ट्र धर्मातून शिवरायांचे स्वराज्य अवतरले आहे. ते स्वराज्य सगळ्यांचे होते. उद्धव ठाकरे यांचे नवे सरकार त्याच महाराष्ट्र धर्माचे पालन करील. महाराष्ट्र धर्माचे नवे सरकार आले आहे.

आज उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार अधिकारावर येईल. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त जसा उत्स्फूर्त सोहळा महाराष्ट्रासह देशात साजरा झाला तोच आनंद, तोच जोश आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात दिसत आहे.

देशातील भलेभले पुढारी दिल्लीश्वरांसमोर गुडघे टेकत आहेत, असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी कोणताही दबाव जुमानला नाही. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या तडजोडी केल्या नाहीत आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या साक्षीने 'खोटे' बोलण्याचा प्रयत्न केला त्या ढोंगाशी हातमिळवणी केली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार हे तीन पायांचे आहे आणि ते टिकणार नाही, असा शाप देवेंद्र फडणवीस यांनी शुभमुहूर्तावरच दिला आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. हे सरकार राष्ट्रीय प्रश्नांवर नाही तर महाराष्ट्राच्या प्रश्नावर आणि विकासाच्या मुद्द्यांवर स्थापन झाले आहे. राज्याचा विकास करण्याबाबत तिन्ही पक्षांत कोणतेही मतभेद नाही.

तसेच मुख्य म्हणजे सरकारी बंगले, सरकारी कार्यालये आणि तपास यंत्रणांचा वापर कपट-कारस्थानांसाठी होणार नाही, हे पक्के. त्यामुळे स्वच्छ-निर्मळ मनाने कारभार चालेल. शरद पवार यांच्यासारखा अनुभवी खंदा मार्गदर्शक पाठिशी आहे. तर दुसरीकडे तिन्ही बाजुला प्रशासनाची चांगलीच जाण असलेल्या माणसांची फौज आहे. मुख्य म्हणजे कोणाच्याही मनात एकमेकांविषयी जळमटे नाहीत. त्यामुळे सर्वकाही सुरळीत चालेल. विरोधकांनी याची काळजी करु नये, असा सल्ला देण्यात आला आहे.