मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस

सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...

Surendra Gangan Updated: Mar 23, 2018, 10:58 PM IST
मंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस title=

मुंबई : सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. माझगावच्या विनायक मजूर सहकारी संस्थेला हे उंदीर मारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी झी २४ तासचे प्रतिनिधी अमित कोटेचा सूर्यकुंड सोसायटीतील या संस्थेच्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. ही मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर शेडगे नावाचं कुटुंब गेल्या २५ वर्षांपासून राहत असल्याची बाब समोर आलीय.

उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार

मंत्रालयामधले उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर उंदीर मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले. हे उंदीर मारण्यासाठी सहा महिन्याचं कंत्राट देण्यात आलं. त्यानंतर हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला. प्रत्यक्षात सात दिवसांतच मंत्रालयातल्या सर्व उंदरांचा बंदोबस्त करण्यात आल्याचं सांगत खडसेंनी हिशेब मांडला. 

भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का?

मुंबई महापालिका दोन वर्षामध्ये 6 लाख उंदीर अख्या मुंबईत मारते. पण मंत्रालयात उंदीर मारण्याचा विक्रम केल्याबद्दल भ्रष्ट अधिकाऱ्यांना पारितोषिक देणार का? असा खोचक सवाल खडसे यांनी केलाय. मंत्रालयातील उंदीर मारण्याचा कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत खडसे यांनी आज विधानसभेत खळबळ उडवून दिली. मंत्रालयात एका मिनिटाला 31 उंदीर, तर सात दिवसात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्याचा विक्रम केल्याचं सांगत खडसेंनी मंत्रालयातच सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर उंदीर मोजण्याची मोहीम हाती घेण्यात आली. 

मारलेल्या उंदरांचे वजन 9125.71 किलो 

या मोहीमेत मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले. हे उंदीर सहा महिन्यात मारण्याचं कंत्राट देण्यात आलं. नंतर हा कालावधी दोन महिन्यांचा करण्यात आला. पण प्रत्यक्षात सात दिवसातच मंत्रालयातले सर्व उंदीर मारण्यात आले. त्यानुसार प्रत्येक दिवसाला 45 हजार 628.57 उंदीर मारण्यात आले, म्हणजेच प्रत्येक मिनिटाला 31.64 उंदीर मारण्यात आले. प्रत्येक दिवसाला मारलेल्या उंदरांचे वजन 9125.71 किलो इतके होते.

धर्मा पाटलांनी यांनी घेतलेले ते विष 

मंत्रालयात मारलेल्या इतक्या उंदरांचे दफन किंवा विल्हेवाट कुठे आणि कोणी केली ती जागा दाखविणार का व कसे केले ते सांगणार का ? मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी विष आणण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग व गृह विभागाची परवानगी घेतल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत नाही, असं सांगत धर्मा पाटलांनी जे विष घेतलं ते या विषामधलंच होतं असा खळबळजनक आरोपही खडसेंनी केलाय.