SSR Case: काहींना बिहारची निवडणूक जिंकल्यासारखा आनंद होतोय- शिवसेना

वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे

Updated: Aug 20, 2020, 11:18 AM IST
SSR Case: काहींना बिहारची निवडणूक जिंकल्यासारखा आनंद होतोय- शिवसेना title=

मुंबई: सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर काही मंडळींना अत्यानंदाचे भरतेच आले आहे. काहींनी तर राजकीय निवडणूक जिंकल्याच्या थाटात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. 

SSR case : सीबीआयची टीम आज मुंबईत येणार

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तपासाची सूत्रे सीबीआयच्या हाती देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाष्य करण्यात आले आहे. 
वादविवाद निर्माण होऊ नये यासाठी प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ‘जितंमया’ करणाऱ्यांनी जरा सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणाकडेही एकदा पाहायला हवे. मात्र, आपण बिहार विधानसभेची निवडणूकच जिंकली अशा पद्धतीने ‘न्याय, सत्य’चा धोशा लावून नितीश कुमार बोलत असल्याचा खोचक टोला शिवसेनेने हाणला. तसेच बिहारमधल्या पोलिसांना मुंबईत क्वारंटाईन केले म्हणून सुशांत प्रकरणात संशय वाढतो असे कुणाचे निरीक्षण असेल व त्या आधारे तपास सीबीआयकडे दिला असेल तर आज देशाची घटना ही अश्रू ढाळत असेल, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर पवारांची खोचक टिप्पणी

न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करू नये, अशा शब्दांत डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.