युतीत खडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे अमित शाहंना पत्र पाठवणार

भाजपा-शिवसेना युतीमध्ये खडा टाकणा-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं समजतं आहे.

Updated: Jun 23, 2019, 05:56 PM IST
युतीत खडा टाकणाऱ्यांवर कारवाई करा, उद्धव ठाकरे अमित शाहंना पत्र पाठवणार title=

मुंबई : भाजपा-शिवसेना युतीमध्ये खडा टाकणा-यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचं समजतं आहे. युतीमध्ये तणाव निर्माण होईल अशी वक्तव्यं करणा-या नेत्यांवर यापुढे कारवाई होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहेत. अशा नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी पत्रात केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना हा नियम लागू असेल, असंही सूत्रांनी सांगितलं.

भाजपा आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा युती झाली असली तरी दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन धुसफूस कायम आहे. मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी पाहा...मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही. ते वेळ आल्यावर पाहू असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुष्काळी दौऱ्यावर केलं आहे.

तर शनिवारीही उद्धव ठाकरेंनी याच मुद्द्यावरून भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपाच मोठा भाऊ असून भाजपाचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमचं ठरलंय दुसऱ्यांनी त्यात नाक खूपसू नये असा टोला उद्धव ठाकरेंनी महाजनांना लगावला.

आम्हीच शिवसेनेला मदत केली!

लोकसभा लढताना भाजपच्या जागा निवडून द्या असच आम्ही म्हणालो नाही. शिवसेनेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्हीच प्रयत्न केले आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत होती, त्याठिकाणी आमची भाजपची टीम होती.आमच्या सगळ्यांची भूमिका आणि भावना मुख्यमंत्री भाजपचा राहावी, अशी आहे. मोठ्या भावाची आमची भूमिका आहे. निकाल राज्यातले बघितले तरी कोणाचा मुख्यमंत्री असावा, हे सांगण्याची गरज नाही, असे गिरीश महाजन म्हणालेत.

चंद्रकात पाटील-दानवेंची सारवासारव

दरम्यान वाद वाढू नये म्हणून चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे यांनी सारवासारव केली आहे. भाजपा आणि शिवसेना विधानसभेतही एकत्र लढणार असून लोकसभा निवडणुकीपेक्षा मोठा विजय मिळवणार असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, ही कोणत्याही कार्यकर्त्याची इच्छा असते. पण मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरे आणि अमित शाह निर्णय घेतील. मुख्यमंत्री कोणाचा? अडीच-अडीच वर्ष का पाच वर्ष याचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. प्रत्येक जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घ्यायची आहे हे अमित शाह यांनी सांगितल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं.