तुमची ईडी तर आमची सीआयडी... विरोधात भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन...

केंद्र सरकारच्या दडपशाहीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्याप्रकारे उत्तर दिलं. त्याच पावलावर पाऊल ठेवत राज्यसरकारने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे.

Updated: May 16, 2022, 07:29 PM IST
तुमची ईडी तर आमची सीआयडी... विरोधात भूमिका घेणाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन... title=

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याविरोधात पोस्ट करणाऱ्या केतकी चितळे ( Keti Chitale ) हिच्याविरोधात राज्यातील विविध १५ ठिकाणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापूर्वीही शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला होता. त्यावेळी ऍड. गुणरत्न सदावर्ते ( Adv. Gunratn sadavarte ) यांच्याविरोधातही अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ), नवाब मलिक ( Nawab Malik ) यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली. तर, अन्य नेत्यांवर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. राज्य सरकार आणि आघाडी सरकारमधील घटकपक्षाच्या नेत्यांनी केंद्र सरकार सुडाची कारवाई करत असल्याचा सातत्याने आरोप करत आहेत.

मात्र, आता केवळ आरोप करण्याऐवजी धडक कृती मोहीम राज्यसरकारने हाती घेतली आहे. केंद्र सरकारच्या दडपशाहीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamta Banarji ) यांनी ज्याप्रकारे उत्तर दिलं. त्याच पावलावर पाऊल ठेवत राज्यसरकारने आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. मात्र, ही कारवाई करताना त्यांना महाराष्ट्र दर्शनाचीही संधी देण्यात येत आहे. 

महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात एकाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत नाही, तर राज्यातील विविध भागात त्यांचर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे एक गुन्ह्यातून सुटका झाली तरी दुसऱ्या ठिकाणी गुन्हे नोंद असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये त्या त्या नेत्यांना हजेरी लावावी लागत आहे. 

सध्या सुरु असलेले केतकी चितळे प्रकरण, गुणरत्न सदावर्ते, राणा दाम्पत्य, प्रविण दरेकर, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर असे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याच्या घटना दिसून येतात. 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekr ) , भाजप नेते मोहित कंबोज ( Mohit Kamboj ), किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण याची सुरुवात झाली ती प्रसिद्ध अभिनेत्री कंगणा रनौत ( Kangana Ranout )  हिच्यापासून

कंगणा रनौत हिने शिवसेनेवर अनेकदा टीका केली. अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे तिच्याविरोधात शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले. तर, महापालिकेच्या माध्यमातून तिच्या कार्यालयाला नोटीस पाठवून महापालिकेने त्या कार्यालयावर हातोडाही चालवला. 

ARNAB goSWAMI :  अर्णब गोस्वामी : अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे शिवसेना आमदारांनी विधानसभेत त्यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता. अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल झाला. टीआरपी घोटाळा, पोलीस दल संदर्भाभातील वादग्रस्त वक्तव्य यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

NARAYAN RANE : नारायण राणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांचे वैर सर्वश्रुत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याच प्रकरणात त्यांच्यावर महाड, रायगड, नाशिक आणि पुणे येथेही गुन्हे दाखल झाले होते.

तर, आदित्य ठाकरे यांना उद्देशून विधानसभेच्या पायऱ्यांवर 'म्याव' आवाज काढणारे नारायण राणे यांचा आमदार मुलगा निलेश राणे याच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. नितेश राणे यांना एका खून खटला प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच, राणे यांच्या बंगल्याला अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाईची नोटीसही पाठविण्यात आली होती.

ADV. GUNRATNA SADAVARTE : ॲड. गुणरत्न सदावर्ते : शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवले. पवार यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी कामगारांना भडकवले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. सदावर्ते यांच्यावरही सातारा, कोल्हापूर, अकोला आणि सोलापुर अशा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते.

RANA cOUPLE : राणा दाम्पत्य : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचं आवाहन दिलं होतं. यावरून शिवसैनिकांनी मोठा राडा केला होता. आघाडी सरकारने राणा दाम्पत्यावर थेट राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. यामुळे या दाम्पत्याला 12 दिवस जेलची हवा खावी लागली. याच दरम्यान, मुंबई महापालिकेने त्यांच्या खार येथील घरामध्ये असलेले अनधिकृत बांधकाम कडून टाकण्यासाठी नोटीस पाठविली होती.

KETKI CHITALAE : केतकी चितळे : शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्याविरोधात १५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. कळवा, अकोला, पवई, गोरेगाव, पवई, अमरावती, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा याठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.