विलासराव अनंतात विलीन, महाराष्ट्रावर सुतकी कळा

केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील घराजवळील वडीलोपार्जित शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Rohit Gole Rohit Gole | Updated: Aug 15, 2012, 05:12 PM IST

www.24taas.com, लातूर
केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर बाभळगाव येथील घराजवळील वडीलोपार्जित शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख यांनी मुखाग्नी दिला. रितेश व धीरज देशमुख यांनीही मुखाग्नी दिली. अत्यंसंस्काराच्या वेळेस अनेक दिग्गजांच्यासह लाखो लोक उपस्थित होते.
दुपारी १२ च्या सुमारास त्यांचे पार्थिव बाभळगाव येथील दयानंद विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. तिथे त्यांची पत्नी वैशालीताई, पुत्र अमित, रितेश, धीरज उपस्थित होते. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बाभळगावमध्ये दुपारी अडीच वाजता दाखल झाल्या होत्या.
दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपून ते विशेष विमानाने लातूरकडे रवाना झाले होते. पंतप्रधानांनी पुष्पचक्र वाहून विलासरावांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. राज्यपाल के. शंकरनारायण यांनीही विलासराव यांना श्रद्धांजली वाहिली.