टीम इंडियाची उपांत्य फेरीत धडक

टीम इंडियाने बांग्लादेशवर सहज मात करत टी-२०च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने ९ बॉल्स आणि ८ विकेट राखून बांग्लादेशचा दणदणीत पराभव केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 29, 2014, 04:19 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मीरपूर
टीम इंडियाने बांग्लादेशवर सहज मात करत टी-२०च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली. भारताने ९ बॉल्स आणि ८ विकेट राखून बांग्लादेशचा दणदणीत पराभव केला.
या विराट कोहली (नाबाद ५७ रन्स) तुफान फटकेबाजी केली. त्याला साथ रोहित शर्माने (५६ रन्स) दिली. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे बांग्लादेशवर सहज विजय मिळवता आला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा भारत पहिला संघ ठरला.
भारताचा सुपर टेन फेरीतील हा सलग तिसरा विजय ठरला. ग्रुप दोनमधून भारतीय संघाने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्‍चित केला तर यजमान संघ उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला.
भारताने लेगस्पिनर अमित मिश्रा (३-२६) आणि ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्‍विन (२-१५) यांच्या भेदक गोलंदाजीमुळे बांग्लादेशचा संघ ७ बाद १३८ रन्सवर रोखला. विजयासाठी आवश्यक धावा १८.३ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवन (१) झटपट माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा (५६) आणि विराट कोहली (नाबाद ५७) यांनी दुसर्‍या विकेटसाठी १०० रन्सची भागीदारी करीत भारताचा विजय निश्‍चित केला.
रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीने कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद २२ रन्स) साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी, अँनामुल हक (४४) आणि महमुदुल्ला (नाबाद ३३) यांनी दिलेल्या योगदानामुळे बांग्लादेशने ७ बाद १३८ रन्सवर मजल मारली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.