संमेलनाचा थाट, पण कलाकारांकडे पाठ

९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन थाटात पार पडलं पण कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा संयोजकांना विसर पडल्याची ओरड होत आहे. तमाशा सम्राट अंकुश खाडे यांना नाट्यसंमेलनाचं साधं निमंत्रणही पाठवण्यात आलं नसल्याची खंत खाडेंनी बोलून दाखवली.

Updated: Jan 24, 2012, 10:42 PM IST

रवींद्र कांबळे, www.24taas.com, सांगली

 

९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन थाटात पार पडलं पण कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा संयोजकांना विसर पडल्याची ओरड होत आहे. तमाशा सम्राट अंकुश खाडे यांना नाट्यसंमेलनाचं साधं निमंत्रणही पाठवण्यात आलं नसल्याची खंत खाडेंनी बोलून दाखवली.

 

तमाशाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या काळू-बाळूची सगळ्यांनाच आठवण आहे या जोडगोळीतील तमाशासम्राट बाळू उतारवयात उपेक्षेचं जीवन जगत आहेत. आणि काळू यांचं ७ जुलैला निधन झालं. या दोघांनी तमाशाच्या साथीने सांगलीची पताका महाराष्ट्रभर फडकवली. पण सरकारनेही कधी विचारलं नाही  आणि त्यात सांगलीत नाट्यसंमेलन होऊनही मला साधं निमंत्रणही संयोजकांनी पाठवू नये याची खंत बाळू म्हणजेच अंकुश खाडे यांनी बोलून दाखवली.

 

याबाबत नाट्यसंमेलनाच्या संयोजकांना विचारलं असता त्यांनी नियोजनाच्या गडबडीत निमंत्रण देता आलं नाही असं मान्य केलं आणि  बाळू यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचं म्हटलं आहे. अनेक वर्ष कलेची,रंगमंचाची सेवा करणारे बाळू उपेक्षेचे धनी ठरले आहेत. नाट्यसंमेलन समितीनं घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याने अंकुश खाडे यांचं दुःख कमी होणार का अशीच चर्चा सांगलीत सुरू आहेत.