`वास्तव` की `गुमराह` ?

का रडला बॉलीवूडचा `खलनायक`? मुन्नाभाईच्या कामी येणार का गांधीगिरी ?

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 28, 2013, 11:38 PM IST

www.24taas.com, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षाची शिक्षा पाच वर्षं केल्यानंतर अभिनेता संजय दत्त प्रथमच मीडियाला सामोरा गेला..तो कधी धीरगंभीर झाला तर कधी त्याला अश्रू अनावर झाले. एखाद्या बॉलीवूडपटातल्या कथेला शोभावी अशीच त्याची पत्रकार परिषद होती..
तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला तुम्ही यापूर्वी अनेक वेळा रुपेरी पडद्यावर बघीतलं असेल. पण वास्तवात जेव्हा तुरुंगात जाण्याची वेळ त्याच्यावर आली तेव्हा संजय दत्त ढसाढसा रडला. सर्वेच्च न्यायालयाने संजय दत्तची पाच वर्षींची शिक्षा कायम केल्यानंतर पहिल्यांदाच तो प्रसार माध्यमांनासमोरा गेला. यावेळी तो जे काही बोलला ते एखाद्या हिंदी सिनेमातील संवादा प्रमाणेच होते. चित्रपटाप्रमाणेच संजय दत्तची वास्तवातील पत्रकार परिषदही इमोशनल होती.
आपण लवकरच न्यायालया शरण जाणार असल्याचं सांगत, शिक्षा माफ व्हावी यासाठी अर्ज करणार नसल्याचही संजय दत्तने यावेळी स्पष्ट केलं...संजय दत्तची शिक्षा माफ करु नये अशी मागणी करणा-यांना बहुतेक संजय दत्तचा हा मास्टर स्ट्रोक होता...तसेच एक वेळ तर असं वाटलं की सगळं काही त्याच्या आश्रूत वाहून जाईल...एवढा त्या पत्रकार परिषदेचा स्क्रिनप्ले टाईट होता..
संजय दत्तची बॉडी लँग्वेजही नेहमीपेक्षा जरा वेगळीच होती. त्याने पत्रकारांच्या नजरेला नजर भिडवण्याचं टाळलं. त्याचा आवाज गंभीर होता. त्याने केवळ आपल म्हणणं पत्रकारांसमोर मांडलं मात्र पत्रकारांच्या एकाही प्रश्नांला उत्तर दिलं नाही..पत्रकारपरिषदेत तो रडला...पण त्याच्या आश्रूं मागे दडलंय तरी काय ? असा प्रश्न सर्वांनाच पडलाय...
संजय दत्तने शिक्षेविषयी आपलं मत व्यक्त केलंय...मात्र त्याची शिक्षा माफ व्हावी यासाठी माजी न्यायमूर्ती मार्केंडेय काटजू पासून ते राष्ट्रीय लोकमंचाचे सर्वेसर्वा अमरसिंग यांनी कंबर कसलीय..तर त्याला विरोधही तेव्हड्याच प्रखरतेनं होत आहे..
पाच वर्षाच्या शिक्षेप्रकरणी संजय दत्तने प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी त्याच्या शिक्षेचा मुद्दा चांगलाच गाजलाय...संजय दत्तची शिक्षा माफ व्हावी अशी मागणी माजी न्य़ायमूर्ती आणि प्रेस काऊंसिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी केलीय...आणि विशेष म्हणजे संजय दत्तच्या स्पष्टीकरणानंतरही न्यायमूर्ती काटजू आपल्या भूमिकेवर ठाम आहे..तसेच संजय दत्तचे राजकीय गुरु आणि राष्ट्रीय लोकमंचचे सर्वेसर्वा अमरसिंग यांनीही संजय दत्तची बाजू घेतली आहे..

संजय दत्तची शिक्षा माफ व्हावी अशी मागणी होत असली तरी त्याला तेव्हडाच विरोध होत आहे. शिक्षेप्रकरणी संजय दत्तने आपली बाजू मांडली असली तरी त्याच्या शिक्षेचा मुद्दा आणखी काही काळ तरी चर्चेत राहणार हे मात्र नक्की.