ही आत्मचिंतनाची वेळ - सोनिया गांधी

जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 18, 2013, 04:06 PM IST

www.24taas.com, जयपूर
जयपूरमध्ये सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेससाठी ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. सर्वांनी स्वार्थ बाजूला ठेवून एकत्र काम करण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. तसंच ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत नाही त्या राज्यांबाबत ही चिंतेची बात आहे. ज्या राज्यांत काँग्रेसची सत्ता नाही तिथं एकी दाखवायलाच हवी, असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलंय.
गुलाबी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरमध्ये काँग्रेसच्या चिंतन शिबिरात सोनिया गांधी बोलत होत्या. गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात यूपीएनं अनेक चांगली कामं केली असली, तरी देशाचा बराचसा भाग अद्याप मागासच राहिला आहे. आर्थिक विकासाचा फायदा सर्वच स्तरावरील लोकांना मिळाला पाहिजे, असं सोनिया यांनी यावेळी म्हटलंय.
‘दहशतवादावरही यावेळी सोनिया गांधी यांनी भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला थारा दिला जाणार नाही. पक्ष याबाबतीत खूप गंभीर आहे. आज साऱ्या देशालाच सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. बदलत चाललेल्या भारताला ओळखण्याची खरी गरज आहे. गेल्या ९ वर्षांच्या काळात देशाचा चांगलाच विकास झालाय. सामाजिक विषयांबरोबरच विकासाचीही तितकीच गरज आहे. काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिलंय’ असं म्हणत सोनियांनी एका वेळी अनेक विषयांना हात घालायचा प्रयत्न केला.

महिलांवर होत असलेल्या अत्याचार हा लाजिरवाणा प्रकार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काँग्रेसचं हे चिंतन शिबिर दोन दिवस चालणार आहे. २०१४ च्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या विविध स्तरांवर विचारमंथन करण्याचा पक्षाचा हा प्रयत्न आहे.