गरिबीची नवी व्याख्या : ५ व्यक्तींसाठी महिन्याला ६०० रुपये पुरेसे!

पाच व्यक्तींचा सहभाग असलेल्या कुटुंबाला महिन्याला ६०० रुपये पुरेसे आहेत, असं वक्तव्य शिला दीक्षित यांनी केलंय.

Updated: Dec 18, 2012, 08:02 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिवसाला २८ रुपये कमावणारी व्यक्ती गरीब नसल्याचं सांगून नियोजन आयोगानं अगोदरच गरिबीची आणि गरिबांची एकप्रकारे थट्टाच केली होती. त्यातच आता दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी कळस चढवलाय. पाच व्यक्तींचा सहभाग असलेल्या कुटुंबाला महिन्याला ६०० रुपये पुरेसे आहेत, असं वक्तव्य शिला दीक्षित यांनी केलंय.
दिल्लीत काँग्रेस सरकारने गरजू नागरिकांना महिन्याचे रेशन खरेदी करण्यासाठी ६०० रुपये अनुदान देण्याची योजना अमलात आणली. तिचा प्रारंभ सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेचा लाभ २५ लाख लोकांना मिळेल, असे कार्यक्रमावेळी सांगण्यात आलं. पण पाच ते सात माणसांचे कुटुंब चालविताना रेशनवरचा खर्च किमान तीन हजारांपर्यंत जाऊन पोहोचतो, असं म्हणत सामान्य माणसानं शिलाबाईंच्या या योजनेवर तीव्र नापसंती व्यक्त केलीय.
त्यावर ‘सरकारचे ६०० रुपयांचे मासिक अनुदान हा किरकोळ आधार आहे... पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला वरण-भात आणि पोळी-भाजीसाठी ६०० रुपये सहज पुरतील!’ असं स्पष्टीकरण शिला दीक्षित यांनी दिलंय.