सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 30, 2013, 09:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ७ वन डे सीरिजची सहावी मॅच आज नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे. आज दुपारी दीड वाजता भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने असतील. ही मॅच टीम इंडियाला जिंकावी लागेलच.. जर सहावी वन डे ऑस्ट्रेलियानं जिंकली तर भारताला वन डे मालिका गमवावी लागेल.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग लाईन अप तुफान फॉर्ममध्ये आहे. जेम्स फॉकनर, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, अॅरॉन फिन्च आणि फिल ह्युजेस दमदार बॅटिंग करत आहेत. त्यामुळं भारतीय बॅट्समनना आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरावं लागेल.
शिखर धवन आणि रोहित शर्मावर खूप महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांनी जर सुरूवात चांगली केली तर पुढंही चांगलं होईल, अशी अपेक्षा आहे. विराट कोहली मधल्या फळीत सातत्यपूर्ण कामगिरी करतोय, तर धोनीच्या बॅटिंगमध्ये टीमला संकटातही तारुन नेण्याची क्षमता आहे. पण सुरेश रैना, युवराज सिंग आणि रवींद्र जाडेजाला मधल्या फळीत रन्स काढण्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल.
रांचीतल्या चौथ्या वन डेत मोहम्मद शमीनं आपल्या धारदार आक्रमणानं कांगारुंना रोखलं होतं. शमीनं आठ ओव्हरमध्ये ४२ रन्स देत तीन विकेट घेतल्या होत्या. शमीपासून सावध राहा असा इशाराचा कॅप्टन जॉर्ज बेलीनं आपल्या बॅट्समनना दिलाय. शमीबरोबरच भुवनेश्वर कुमार, विनय कुमार या मध्यमगती तर अश्विन आणि जाडेजा या स्पिनर्सनाही कांगारुंना रोखावंच लागेल.
इतिहास बघता नागपूरच्या जामठा स्टेडियमवर आतापर्यंत टीम इंडियानं खेळलेल्या तीन मॅच पैकी एकच मॅच जिंकलेली आहे. पण आता धोनी ब्रिगेडला हा इतिहास पुसून काढत विजयाचा इतिहास रचावा लागणार आहे. त्यामुळं सर्व क्रिकेट फॅन्सच्या नजरा आज नागपूरकडे लागल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.