काळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा

जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली. 

PTI | Updated: Nov 17, 2014, 08:09 AM IST
काळ्या पैशांसाठी भारताच्या भूमिकेला ‘जी-२०’चा पाठिंबा title=

ब्रिस्बेन: जी-२० शिखर परिषदेत रविवारचा दिवस खास भारताचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली काळ्या पैशांबाबतची भूमिका संपूर्ण संघटनेनं उचलून धरली. 

काळ्या पैशांबाबत पारदर्शी धोरण हवं तसंच त्याची माहिती उघड करता आली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. ही भूमिका जी -२० संघटनेनं उचलली. काळ्या पैशांची माहिती आपोआप मिळावी त्यासाठी नवं जागतिक धोरण ठरवावं, असं मोदी यांचं म्हणणं होतं.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना माहिती दिली. पारदर्शकता हा शब्द परिषदेच्या मसुद्यात नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करून मांडलेल्या प्रभावी भूमिकेनंतर हा शब्द मसुद्याच्या अंतिम स्वरूपात समाविष्ट करण्यात आला, असं या दोघांनी सांगितलं. 

परदेशात ठेवलेल्या पैशांची माहिती नव्या तंत्रज्ञानानुसार मिळाल्यास तो पैसा परत आणता येणं शक्य होईल, असं मोदी म्हणाले. काळा पैसा ठेवून घेणाऱ्या देशांनी नियमानुसार कर घ्यावा यालाही भारताचा पाठिंबा असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.