लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला

 लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला. 

Updated: Jun 1, 2016, 10:22 AM IST
लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला title=

नाशिक :  लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला. 

 पांढरी चादर आणि....

२२ मे रोजी दोघांचा विवाह झाला होता. त्यावेळी जात पंचायतीने नवरदेवाला पांढऱ्या रंगाची चादर दिली होती. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर ती चादर परत करण्यास सांगितले होते. नवरदेवाने दुस-या दिवशी चादर जात पंचायतीमधील सदस्यांना दाखवली त्यावर रक्ताचे डाग नव्हते. त्यावरुन पंचांनी वधू कुमारीका नसल्याचा निष्कर्ष काढत विवाह मोडण्याचा आदेश दिला. 

 

शरिरातील बदल कशामुळे....

नववधू विवाहाआधी  पोलिस भरतीसाठी तयारी करत होती. त्यात धावणे, लांब उडी, सायकलिंग आणि अन्य व्यायाम प्रकारांचा समावेश होता असे सामाजिक कार्यकर्ते रंजना गावंडे आणि कृष्णा चांदगुडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले. यावर सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर, पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या संदर्भातील व्हॉट्सअॅप मेसेज 

ती आणि तीचं कौमार्य...

ती एकदम सुंदर तरुणी... विशीतली...उंचपुरी...गोरगोमटी.... एखाद्या चित्रपटाची नायिका शोभेल अशी ! पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे.या बावीस तारखेला तीचं लग्न झाले. नवरा मुलग्याचे अगोदर एक लग्न झालेले...तरीही आनंदाने तीने त्याला  स्विकारले.साधारण कुटुंबातील असुनही बापाने कर्ज काढून जोरदार लग्न लावून दिले.सर्व गाजावाजा संपल्यावर अखेर ती वेळ आली.... कौमार्याची परिक्षेची ! वयस्करांनी दोघांना चांगलं तपासून घेतले.जातीच्या पंचानी एक पांढरशुभ्र वस्र त्यांच्या हातात दिलं.त्यावर दोघांनी एकत्र झोपायचं असतं.मंडपा शेजारीच एका खोलीत दोघांना सोडण्यात आले.काही वेळेनंतर जात पंचायत बसली.पंचांनी विचारणा केल्यावर मुलग्याने आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहुब वर्णन केले. शेजारी बसलेल्या बापाने खाली मान घातली. शेवटी पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला. तो म्हणजे  "माल खरा निघाला की खोटा?"

मुलग्याने हातातली पांढरशुभ्र वस्र पंचांकडे दिले.पंचांनी ते बारीकपणे बघितलं.त्यावर रक्ताचा डाग नव्हता.पंचांनी त्या मुलग्याकडे बघीतले. मुलग्याने रागाने उत्तर दिले, " माल खोटा,खोटा,खोटा..."

एकच शांतता पसरली. पंचांनी लग्न रद्द ठरवले.तीने आक्रोश केला.पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याच तीने जीव तोडुन सांगितले.बापाने विनवणी केली.पण पंच हेका सोडायला तयार नव्हते. अखेर मुलग्याच्या नातेवाईकांनी लग्नाच्या सर्व भेटवस्तू जमा करून सोबत घेतल्या. इतकेच नाही तर तीचे अंगावरचे दागिनेही काढून नेले. 

वर्‍हाडी तीला तिथेच सोडून निघून गेले. मात्र मंगळसूत्र काढून नेण्याचे ते विसरले नाही. तिसर्‍या दिवशी  हा प्रकार मला समजल्यानंतर अॅड रंजना गवांदे सोबत तीचे घर गाठले.लग्नाचे वातावरण आता सुतका सारखे झाले होते.सर्वच रडत होते. आणखी दोन मुलींच्या लग्नाच्या काळजीने बापाची पोलीसांत येण्याची तयारी नव्हती. पण काहीतरी चमत्कार घडेल या आशेवर पाच दिवस झाले तरी घरासमोरचा मंडप सोडला नव्हता. 

मुलगी व आई हिंमतवान असल्याने नंतर त्यांनी गुपचूप पोलीस स्टेशन गाठले.बापाने दोघींना ओरडत घरी नेले. मोबाईल काढून घेतले.नजरकैदेत ठेवले. जातीचे प्रश्न जातीतच सोडविण्याच्या मानसिकतेने इतर प्रश्न उभे ठाकले आहे. पण आम्ही हिंमत सोडणार नाही. आणखी एका भगिनीला न्याय मिळवून देणार आहोत...नक्कीच.
लढेंगे....जितेंगे !

( कृपया, मी कोणत्याही जातीचे नाव घेतले नाही, त्यामुळे कुणी नेहमी प्रमाणे मला  धमकी देऊ नये. वास्तव समोर आणणे, हाच प्रामाणिक हेतू आहे. कुणाला जातीची बदनामी वाटत असेल तर अशा कौमार्याची परीक्षा घेणे बंद करावे. जमल्यास एक लग्न झाल्यावर दुसरे लग्न करणार्‍या मुलग्याने स्वतःचे कौमार्या तपासावे - कृष्णा चांदगुडे)