१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - मुख्यमंत्र्यांची टीका

'अच्छे दिन आयेंगे' असं सांगत जनसामान्यांवर आश्वासनांची बरसात करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केलं नसून त्यांनी संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी मोदी केंद्रात एकाधिकारशाही करत असून त्याचा फटका ज्येष्ठ नेत्यांनाही बसल्याचं म्हणाले. 

Updated: Sep 2, 2014, 06:08 PM IST
१०० दिवसांत मोदी सरकारकडून भ्रमनिरास - मुख्यमंत्र्यांची टीका title=

मुंबई: 'अच्छे दिन आयेंगे' असं सांगत जनसामान्यांवर आश्वासनांची बरसात करणाऱ्या मोदी सरकारनं गेल्या १०० दिवसांत एकही आश्वासन पूर्ण केलं नसून त्यांनी संपूर्ण भ्रमनिरास केल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी मोदी केंद्रात एकाधिकारशाही करत असून त्याचा फटका ज्येष्ठ नेत्यांनाही बसल्याचं म्हणाले. 

केंद्रात मंत्र्यांची संख्या कमी केली, खासगी सचिव नेमण्याचा अधिकारही कोणालाही देण्यात आलेला नाही, मंत्र्यावर पाळत ठेवली जाते, हा सर्व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. जनतेला 'चांगल्या दिवसांची' स्वप्नं दाखवणाऱ्या सरकारनं जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केली, रेल्वेचे तिकीटदरही मोठ्या प्रमाणात वाढवले,  त्यामुळं हे सरकार 'गरिबांचं नव्हे तर धनदांडग्यांचं आहे', हे दिसत आहे असं ते म्हणाले. 

मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना कस्पटासमान लेखून संसदीय बोर्डातून बाहेर काढल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यपालांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली आणि नवीन राज्यपालांची नेमणूक या सर्वांमुळं सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी '५ सप्टेंबर' रोजी पंतप्रधानांचं भाषण सर्व विद्यार्थ्यांना ऐकवण्याच्या निर्णयावरही टीका केली. विद्यार्थ्यांनी आपलं भाषण ऐकलंच पाहिजे अशी सक्ती पंतप्रधानांनी केल्याची बाब चुकीची असल्याचं सांगत मुलांच्याबाबतीत अशी प्रपोगंडा करण्याची पद्धत अयोग्य असल्याचं चव्हाण म्हणाले.

भीषण ऊर्जाटंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पंतप्रधानांनी स्वत: सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवायला हवी अशी मागणी आपण केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कोळसा खाणींच्या वाटपासंदर्भात  सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं वीजटंचाई टाळण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. 

दरम्यान, पंतप्रधान मुंबईत आले त्यावेळी आपण प्रत्येकवेळी प्रोटोकॉल पाळला. परंतु सभेमध्ये मी उपस्थित केलेल्या महत्वाच्या मुद्यांकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केल्याचं चव्हाण म्हणाले. तसंच आपल्या भाषणाच्यावेळी हेतुपुरस्सर आणि नियोजनपूर्वक हुल्लडबाजी केल्याचा आरोप पुन्हा चव्हाण यांनी केला. हे प्रकार महाराष्ट्र, झारखंड आणि हरयाणामध्ये झाले आणि त्यामुळंच हे उच्चस्तरावरून जाणीवपूर्वक केल्याचं दिसत आहे, असं चव्हाण म्हणाले.

एकंदरच निवडणुकीच्यावेळी केलेल्या घोषणा, जाहिरातबाजी हे फक्त देखावे असून लोकांना दाखवलेले 'अच्छे दिनांचे स्वप्न' प्रत्यक्षात येताना दिसत नसल्याचं ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.