प्रजासत्ताक दिनी ‘महाराष्ट्रा’विना होणार संचालन!

मंत्री आणि अधिकाऱ्यांमधल्या विसंवादामुळे सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ झाल्याच्या अनेक बातम्या आपण आजवर ऐकल्या आहेत. पण आता याच विसंवादाचा फटका दिल्लीतल्या विजयपथावरील संचलनात सहभागी होणाऱ्या राज्याच्या चित्ररथालाही बसलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 26, 2012, 12:08 PM IST

www.24taas.com, मुंबई
मंत्री आणि अधिकाऱ्यांमधल्या विसंवादामुळे सरकारी योजनांचा बट्ट्याबोळ झाल्याच्या अनेक बातम्या आपण आजवर ऐकल्या आहेत. पण आता याच विसंवादाचा फटका दिल्लीतल्या विजयपथावरील संचलनात सहभागी होणाऱ्या राज्याच्या चित्ररथालाही बसलाय.
प्रजासत्ताकदिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील सांस्कृतिक ठेवा देशवासियांसमोर मांडण्याची संधी प्रत्येक राज्याला असते. महाराष्ट्राचा चित्ररथही यात असतो. राज्यानं सलग तीन वर्ष प्रथम पारितोषिक पटकावण्याचा पराक्रमही केलाय. मात्र यंदा राज्याच्या चित्ररथाची प्रवेशिकाच पोहचू शकलेली नाही.

सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे, खात्याचे संचालक आशुतोष घोरपडे आणि सहसंचालिका मीनल जोगळेकर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे चित्ररथाची प्रवेशिकाच वेळेत न पोहचल्यानं राज्य सरकारच्या चित्ररथाला यंदाच्या संचलनात भाग घेता येणार नाही. चित्ररथाच्या विषयावरून हा घोळ झाल्याचं सांगण्यात येतंय.