मंत्रालयात धडाडणार ‘रेल्वे सेल’

राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 13, 2013, 08:34 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यामध्ये आता रेल्वे प्रकल्प रखडणार नाहीत, प्रकल्पांची कामे अधिक वेगाने होतील. याचं कारण म्हणजे राज्यशासनानं मंत्रालयात ‘रेल्वे सेल’ची स्थापन केला आहे. या सेलमध्ये रेल्वे अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलीय.
‘रेल्वे सेल’मुळे प्रकल्पांबाबत राज्य सरकार आणि रेल्वे यांमध्ये चांगला समन्वय साधला जाणार आहे. मंत्रालयात रेल्वेचा सेल स्थापन करण्याचं कारण म्हणजे राज्यात असलेलं रेल्वेचे सुमारे ४,९०० किमीचं जाळं. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व रेल्वे असे राज्यात रेल्वेचे पाच झोन आहेत. राज्यातील बहुतेक सर्व नवीन रेल्वे प्रकल्पांमध्ये राज्य सरकारचा ५० टक्के वाटा आहे. या प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारला या पाच रेल्वे झोनकडे विविध पातळ्यांवर संपर्क साधावा लागतो. रेल्वेची स्वतःची कार्यपद्धती आणि शासनाचा लाल फितीचा कारभार यामुळे रेल्वे प्रकल्पांचं गाडं अनेक वर्ष पुढं सरकत नाही. म्हणूनच समन्वयासाठी मंत्रालयामध्ये रेल्वे सेल स्थापन करण्यात आलाय.

विशेष करुन या सेलचा फायदा हा रेल्वे मार्गावर उड्डाणपुलांची बांधणी, रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण, पुनर्वसन यामध्ये समन्वय साधण्यासाठी होणार आहे. यामुळे राज्यातील रखडलेले तसंच प्रस्तावित प्रकल्प लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.