एकतर्फी राजीनामा नाही; अजित पवारांना उपरती

‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 11, 2013, 01:30 PM IST

www.24taas.com, मुंबई
‘आता पुन्हा एकदा एकतर्फी राजीनामा देणार नाही’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. अजित पवार यांनी ‘सूSSSS’र्वाच्च भाषेत पाण्यासाठी उपोषणाला बसणाऱ्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर अजित पवारांवर टीका झाली. मग, विरोधकांनी आपला विरोध दर्शवित अजित दादांकडे राजीनाम्याची मागणी केलीय. त्यावरच अजित दादांनी हे उत्तर दिलंय.
‘मागच्या वेळी राजीनामा देण्याचा निर्णय व्यक्तिगत पातळीवर घेतला होता त्यावेळी कार्यकर्ते आणि आमदार नाराज झाले होते. त्यामुळे ज्यांनी आता विधीमंडळ नेता बनवलंय, त्यांना आपण शब्द दिलाय. त्यामुळे आता त्यांच्याशी चर्चा करूनच राजीनाम्याबाबत निर्णय घेणार’ असल्याची उपरती आता अजितदादांना झालीय.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सोलापूरमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावं, यासाठी उपोषणाला बसलेले सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी उजनीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या या उपोषणाची अजितदादांनी अर्वाच्य भाषेत खिल्ली उडवली होती.