`बाळासाहेबांच्या नावावर मनसेचं नाटक`

`ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी म्हणजे मनसेचं निव्वळ नाटक आहे` अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 2, 2013, 03:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी मनसेनं केलीय. पण ही मागणी म्हणजे मनसेचं नाटक असल्याची टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय. बाळासाहेबांवर एव्हढंच प्रेम होतं तर बाळा नांदगावकरांनी शिवसेना का सोडली? असा सवाल त्यांनी विचारलाय.
‘आम्ही बाळासाहेबांवर अजूनही किती प्रेम करतोय हे दाखवण्याचं नाटक कुणी केलं असेल आणि याच नाटकाचा बाजार भरणार असेल तर कुणी काय म्हणावं’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी मनसेच्या भूमिकेवर दिलीय.
ईस्टर्न फ्रीवेच्या नावाच्या मुद्द्यावर मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष आमनेसामने आलेत. फ्री वेला बाळासाहेब ठाकरे यांचंच नाव द्या, या मागणीवर मनसे ठाम आहे तर नावाबाबत चर्चेतून मार्ग काढता येईल, असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय. ‘शिवसेना आणि मनसे दोघांनीही आपली आपली मतं व्यक्त केलीत. पण, कुणीही आम्हाला अजूनही विश्वासात घेतलेलं नाही... बाळासाहेब आणि बाबासाहेब यांच्या नावावर चर्चा करणं योग्य नाही, सर्वांनी एकत्र चर्चेला बसून या वादावर तोडगा काढावा’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

‘फ्री वे’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षानं फ्रीवेवर रविवारी आंदोलनही केलं. यावेळी पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी यापूर्वीच ही मागणी केली असल्याचं आरपीआयनं म्हटलं होतं.