`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!

दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 11, 2013, 08:34 PM IST

www.24taas.com, नाशिक
दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.

जिल्ह्यातील १०० क्विंटल सोनं एका बँकेकडे गहाण!
नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढण्यासाठी घरचं स्त्री-धन गहाण टाकलंय. एकट्या सिन्नर तालुक्यातून एक क्विंटल सोनं गहाण टाकण्यात आलंय तर संपूर्ण जिल्ह्यातून दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल १०० क्विंटल सोनं एकट्या स्टेट बँकेकडे गहाण टाकलंय. या भीषण परिस्थितीचा परिणाम मुला-मुलींच्या लग्नावरही झाला असून यंदा हात पिवळं करणंही कठीण झालंय. त्यामुळं अनेकांची लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत.
गावं पडली ओसाड
सारा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळून निघालाय. दुष्काळाच्या दुष्टचक्रानं घेरलेल्या आणि देशोधडीला लागलेल्या बळीराजाच्या अनेक व्यथा समोर येऊ लागल्या आहेत. स्वत:च्या पोटाची खळगी भरणं अनावर होत असल्यानं शेतकऱ्यांनी कवडीमोल भावानं जनावरं विक्रीला काढली आहेत. तर एवढ्यावरही भागत नसल्यानं काहींना थेट गाव सोडण्याचा निर्णय घ्यावा लागलाय.

बळीराजावर गुलामगिरीची वेळ
बळीराजाची ही करूण कहाणी इथच संपलेली नाही. नाशिक जिल्ह्यात तर दुष्काळानं परिसीमा गाठलीय. सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर वेठबिगारीची वेळ आलीय. तालुक्यातल्या एखाद-दुसऱ्या शेतकऱ्यावर ही दुर्दैवी वेळ आलेली नाही तर हजारो शेतकऱ्यांचे तब्बल एक क्विंटल सोने बँकेत गहाण पडलंय. बळीराजावर गुलामगिरीचीच वेळ या दुष्काळानं आणलीय. पावसाच्या पाठ फिरवल्यामुळं आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं शेतकरी देशोधडीलाच लागलाय.