रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

Updated: May 21, 2014, 07:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, रायगड
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.
स्थानिकांनी आपल्या मागणीसाठी केलेल्या आंदोलना वेळी रायगड पोलिसांची दादागिरी या वेळी पाहायला मिळाली. जे एस डब्लू कंपनीच्या खाडीतून होणाऱ्या माल वाहतुकीमुळे शेतीत खारे पाणी घुसल्याने गावकऱ्यांच्या बांध बंदिस्तीचं नुकसान झाले आहे.
या भरपाई पोटी जे एस डब्लू इस्पात कंपनीकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद झाल्याने गावकऱयांचे पाण्यावाचून हाल होत असताना वडखळ नाका येथे केलेल्या आंदोलनात पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी महिला आणि पुरुष गावकऱ्यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांच्या हुकुमशाही विरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. लाठीहल्ला करणाऱ्या संबंधित पोलिसांवर कारवाई ची मागणी ग्रामस्थांनी केलीय. यावेळी गावकर्यांनी राज्य शासन आणि जे एस डब्लू कंपनीचा जाहीर निषेध केला.
दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना अटक केलीय. जे एस डब्लू कंपनी आणि सरकारच्या दडपशाही विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन यापुढे सुरूच राहणार असल्याची माहिती सेनेचे अविनाश म्हात्रे यांनी दिलीय. आंदोलना दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती तर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.