ज्ञान नव्हे अज्ञान पीठ

बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे डॉ.चंद्रशेखर कंबार तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.

Updated: Nov 22, 2011, 12:14 PM IST

झी 24 तास वेब टीम, बेळगाव

 

डॉ चंद्रशेखर कंबार यांची आधुनिक युगातील पुराणांची निर्मिती करणारा उत्तुंग प्रतिभेचा साहित्यिक अशी ओळख, नुकतंच ज्ञानपीठाने त्यांना सन्मानित करण्यात आलं. पण उत्तुंग प्रतिभेचं वरदान असलं तरी सम्यक् दृष्टीकोनाचा त्यांच्या ठायी पूर्ण अभाव असल्याचं त्यांनी आपल्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे. बेळगाव इथे सीमाप्रश्न या संवेदनशील विषयाबाबत मतप्रदर्शन करताना त्यांनी मराठी माणसं फक्त भांडणं आणि दंगा करणारी असतात, असे अकलेचे तारे त्यांनी तोडलेत. हे कमी की काय म्हणून मराठी माध्यमातून शिकायचं असेल तर महाराष्ट्रात जा असंही पांडित्य त्यांच्या मुखावाटे बाहेर पडलं.

 

महाराष्ट्र किती कानडी भाषिक राहतात आणि अशा वक्तव्यांचे पडसाद उमटले तर कानडी संस्थांची वासलात लागू शकते, याची कंबार यांना जाणीव नसावी असं दिसतंय. मराठी माणसाने असे वक्तव्य केलं तर संपूर्ण देशात एकच गदारोळ उठला असता; पण कंबार सारख्या ज्ञानपीठ साहित्यिकाने इतक्या संकुचित विचारांचे दर्शन आपल्या उद्गारातून घडवलं तरी त्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. कंबार सारख्या ज्ञानवंतांनी खेदजनक वक्तव्यं करावीत हेच वेदनादायी आहे. अमराठी भाषिकांचा मराठी माणसाबाबतचा आकस परत एकदा दिसून आला आहे.