भारताचा 'वाघा'सारखा विजय

इंदूर येथील चौथी वनडे भारताने तब्बल १५३ रन्सने जिंकली. त्याच सोबत मालिका ३-१ ने आपल्या खिशात टाकली. सेहवागच्या २१९ धावांच्या जोरावर भारताने केलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २६५ धावातच गारद झाली

Updated: Dec 8, 2011, 04:52 PM IST

झी २४ तास वेब टीम, इंदूर

 

इंदूर येथील चौथी वनडे भारताने तब्बल १५३ रन्सने जिंकली. त्याच सोबत मालिका ३-१ ने आपल्या खिशात टाकली. सेहवागच्या २१९ धावांच्या जोरावर भारताने केलेल्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजची संपूर्ण टीम २६५ धावातच गारद झाली, भारतीय फिरकी जो़डगोळीने वेस्टइंडिजची निम्मा संघ पॅव्हेलियन मध्ये धाडला. राहुल शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी अनुक्रमे ३ विकेट घेतल्या तर रैनाने आपल्या बॉलिंगची चमक दाखविताना २ विकेट आपल्या पदरात पा़डून घेतल्या.

 

पण आज खऱ्या अर्थाने कॅप्टन वीरेंद्र सेहवागने वाघासारखी खेळी करुन वेस्ट इंडिजला कायमचे घायळ केले. त्यांने  कॅप्टनस इनिंगचा नमुना पेश केला, सेहवागने आपल्या तडाकेबाज खेळीमध्ये २५ फोर आणि ७ सिक्सची अक्षरश: उधळण केली. वीरेंद्र सेहवागने आज पुन्हा एकदा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला.

 

भारताच्या ४१८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तब्बल १०० रन्सचा आतच माघारी परतला होता. रामदिनने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने ९६ रन्सची खेळी केली. मात्र भारताच्या एव्हरेस्ट इतक्या आव्हानाला गवसणी मात्र त्यांना घालता आली नाही.