अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं काय होणार? टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार?

तालिबान्यांनी अफगाणिस्तावर कब्जा केल्याने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

Updated: Aug 16, 2021, 06:50 PM IST
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचं काय होणार? टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार? title=

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेलं राजकीय संकट आणि अस्थिरतेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या भवितव्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी टी -20 विश्वचषकात संघाच्या सहभागाबाबतही शंका आहे. मात्र, या संपूर्ण परिस्थितीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) आपली भूमिका मांडली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मीडिया मॅनेजर हिकमत हसन यांनी सांगितलं, 'आमचा संघ टी -20 वर्ल्ड कप खेळणार याबद्दल कोणतीही शंका नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आमचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजबरोबर तिरंगी मालिका खेळणार आहे.

हिकमत पुढे म्हणाले संघाची तयारी सुरू झाली आहे आणि खेळाडू पुढील काही आठवड्यांत प्रशिक्षणासाठी काबूलला परत येतील. आम्ही तिरंगी मालिकेसाठी जागा शोधत आहोत. यासाठी आम्ही श्रीलंका आणि मलेशियाशीही बोलत आहोत. याशिवाय, आम्ही श्रीलंकेच्या हंबनटोटा इथं पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहोत, जी आमच्या तयारीसाठी महत्त्वाची ठरेल.

राशीद खान आणि नबीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू राशीद खान आणि मोहम्मद नबी यांच्याशी बोलले आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की आम्ही आमच्या खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यास सदैव तयार आहोत, आम्ही त्यांच्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करू. काळजी करण्याची काहीच गरज नाही, काबूलमध्ये सर्वकाही सामान्य आहे आणि आम्ही आमच्या कार्यालयात परतलो आहोत.

टी -20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानच्या संघाचा समावेश भारत-पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह 'ब' गटात आहे

राशीद आणि नबी आयपीएलमध्येही खेळणार?

यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात राशीद खान आणि मोहम्मद नबी खेळताना दिसून येतील. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शण्मुगम यांनी उर्वरित स्पर्धेत हे दोन खेळाडू उपलब्ध असतील अशी माहिती दिली आहे. राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये असून तो 'द हंड्रेडमध्ये ट्रेंट रॉकेट्स'कडून खेळत आहे. राशिद खानने या कठीण परिस्थितीत अफगाणिस्तानला एकटं सोडू नये, असं आवाहन जागतिक नेत्यांना केलं होतं.