36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं...टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला अश्रू अनावर

कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजमध्ये कमबॅक करण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्विकारली.

Updated: Jun 17, 2022, 09:19 AM IST
36 ऑल आऊट ते सिरीज जिंकणं...टीमचा प्रवास सांगताना Ajinkya Rahane ला अश्रू अनावर title=

मुंबई : 2021 मध्ये झालेली इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबामध्ये रंगलेली क्रिकेट टेस्ट मॅच प्रत्येकाच्या लक्षात असेलच. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 2-1 अशी टेस्ट सिरीज जिंकत इतिहास रचला होता. दरम्यान या सिरीजच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या असून याविषयी बोलताना तत्कालीन कर्णधार अजिंक्य रहाणेला अश्रू अनावर झाले आहेत.

2020-2021 च्या नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली होती. यावेळी 4 टेस्ट सामने खेळण्यात आले होते. पहिल्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची दाणादण उडवत दुसऱ्या डावात अवघ्या 36 रन्समध्ये टीम इंडियाला ऑलआऊट करत सामना जिंकला. इतक्या दारूण पराभवानंतर आणि कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर कमबॅक करण्याची जबाबदारी अजिंक्य रहाणेने स्विकारली.

नुकतंच या टेस्ट सिरीजवर एक डॉक्युमेंट्री रिलीज करण्यात आली आहे. 'बंदो मे था दम' असं या डॉक्युमेंट्रीचं नाव असून ऑस्ट्रेलियाविरूद्धची ही सिरीज जिंकवण्यात ज्या खेळाडूंचा मोलाचा वाटा होता त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये कोहलीनंतर उर्वरीत 3 सामन्यांच्या कर्धणारपदाची धुरा सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे. 

या डॉक्युमेंट्रीमध्ये बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, अॅडलेड टेस्टमध्ये 36 वर टीम इंडिया ऑलआऊट झाली होती तेव्हा लोकं आमच्याविषयी वाईट बोलत होते, अगदी आमच्याविरोधात गेले होते. त्या सगळ्या गोष्टी शेवटचा सामना जिंकल्यानंतर माझ्या डोक्यात आल्या. तेव्हा आम्ही कुठे होतो आणि आता कुठे आहोत याचाच विचार मी करत होतो.

दरम्यान ही सर्व कहाणी सांगताना अजिंक्य रहाणेचे डोळे पाणावले होते. या सिरीजमध्ये 2 सामन्यांत विजय मिळवून भारताने इतिहास रचला होता. अजूनही ही सिरीज क्रिकेट प्रेमींना रोमाचिंत करते.