Asia Cup 2022: केएल राहुलला मिळणार डच्चू, दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला मिळणार संधी?

पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघात ओपनिंग जोडीत होणार बदल? रोहितबरोबर हा खेळाडू करणार इनिंगची सुरुवात

Updated: Aug 30, 2022, 06:29 PM IST
Asia Cup 2022: केएल राहुलला मिळणार डच्चू, दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला मिळणार संधी? title=

Asia Cup 2022 : एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात दमदार झालीय. पहिल्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (India vs Pakistan) पाच विकेटने धुळ चारत शानदार विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा दुसरा सामना बुधवारी नवख्या हाँगकाँगशी होणार आहे. टीम इंडियाने (Team India) हा सामना जिंकल्यास ते सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहे . त्यामुळे टीम इंडियाला हा सामना हलक्यात घेऊन चालणार नाही.

भारतीय संघात होणार बदल
हाँगकाँगविरुद्धच्या (HongKong) सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) केएल राहुलने (KL Rahul) डावाची सुरुवात केली. पण सामन्याच्या पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर केएल राहुल बाद झाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाच नसीम शाहने (Naseem Shah) राहुलची दांडी गुल केली.

त्यामुळे केएल राहुलला या सामन्यात संघाबाहेर ठेवण्याची शक्यता आहे. त्याच्याऐवजी संघात विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) संधी मिळू शकते. ऋषभ पंत चांगल्या फॉर्मात आहे. संघात संधी मिळाल्यास ऋषभ पंत रोहित शर्माबरोबर भारतीय संघाची सुरुवात करु शकतो. 

पहिल्या सामन्यात पंतला वगळलं
पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेईंग इलेव्हनमधून ऋषभ पंतला वगळलं होतं. रोहितच्या या निर्णयावर आता भारतीय क्रिकेट वर्तुळात जोरदार टीका केली गेली. विकेटकिपर म्हणून टीम इंडियात ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी दिनेश कार्तिकला (Dinesh Kartik) संधी देण्यात आली होती.

दिग्गज क्रिकेटपटूंनी व्यक्त केला संताप
टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कर्णधार रोहित शर्माच्या या निर्णयावर चांगलाच संतापला होता. मी संघ निवडला असता तर दिनेश कार्तिकपेक्षा ऋषभ पंतची निवड केली असती असं गंभीरने म्हटलं. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही (Vasim Akram) रोहितच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं होतं. एशिया कप स्पर्धेनंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा आहे. ऋषभ पंत चांगला विकटकिपर आणि सुपरस्टार फलंदाज आहे. त्यादृष्टीने भारतीय संघाने भविष्याचं नियोजन करावं असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.