टी20 कर्णधारावरुन जय शाह आणि गंभीरमध्ये मतभेद? 'या' खेळाडूकडे नेतृत्व देण्यास नव्या कोचचा नकार

India T20 Captain : श्रीलंका दौऱ्याला अवघ्या एक आठवड्यांचा अवधी उरला आहे. पण अद्यापही टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. यादरम्यान एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. टी20 संघाच्या कर्णधारावरुन जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात आहे.

राजीव कासले | Updated: Jul 18, 2024, 03:00 PM IST
 टी20 कर्णधारावरुन जय शाह आणि गंभीरमध्ये मतभेद? 'या' खेळाडूकडे नेतृत्व देण्यास नव्या कोचचा नकार title=

Gautam Gambhir And Jay Shah Conflict : येत्या 27 जुलैपासून भारत आणि श्रीलंकादरम्यान (India vs Sri Laka) टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पण दौऱ्यासाठी अवघा एक आठवड्याचा अवधी उरला असतानाही अद्याप टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आलेली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा टी20 कर्णधार कोण असणार याबाबातही स्पष्टता नाहीए. यादरम्यान एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार भारताचा टी20 कर्णधार कोण असणार यावरुन बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आणि टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात मतभेद असल्याचं बोललं जातंय.

टीम इंडियाचा टी20 कर्णधार कोण?
टी20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता ही जबादारी कोणत्या खेळाडूवप सोपवली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष बीसीसीआयच्या निर्णयाकडे लागलं हे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या रोहित शर्माची जागा घेणार अशी चर्चा रंगली आहे. पण आता अचानक कर्णधार पदाच्या शर्यतीत सूर्यकुमार यादवचा समावेश झाला आहे. 

जय शाह आणि गौतम गंभीरमध्ये मतभेद?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या टी20 कर्णधारपदी हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यासाठी सचिव जय शाह आग्रही आहेत. तर गौतम गंभीर याचा या निर्णयाला विरोध आहे. टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपववी असं गंभीरचं मत आहे. यावरुनच दोघांमध्ये तू तू-मै मै सुरु असल्याचं समोर आलं आहे. हार्दिक पांड्या वारंवार गंभीर दुखापतग्रस्त होत असल्याने अनेक वेळा तो ब्रेक घेतो. वर्कलोड मॅनेजमेंटवरुनही गंभीर हार्दिकवर नाराज आहे. त्यामुळे हार्दिकच्या कर्णधारपदाला गौतम गंभीरचा तीव्र विरोध आहे. 

आज संघाची घोषणा?
रिपोर्टनुसार श्रीलंका दौऱ्यासाठी आज 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्यात टीम इंडिया तीन टी20 सामने आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्यासाठी बुधवारी म्हणजे 17 जुलैला घोषणा केली जाणार होती. पण अचानक निवड पुढे ढकलण्यात आली. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह 19 ते 22 जुलैदरम्यान आयसीसीच्या बैठकीला उपस्थित राहाणार असल्याचं समजतंय. त्यामुळे आजच टीम इंडियाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आजच भारताच्या टी20 कर्णधाराचं नावही घोषित केलं जाणार आहे.