विराटला आराम द्या, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा बीसीसीआयला सल्ला

या खेळाडूचा ट्विटला काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सुनावले आहे.  

Updated: Apr 8, 2019, 06:13 PM IST
विराटला आराम द्या, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा बीसीसीआयला सल्ला title=

बंगळुरू : विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूची यंदाच्या आयपीएलमध्ये पराभवाची मालिका कायम आहे. रविवारी कोलकात्याने बंगळुरूचा ४ विकेटने पराभव केला. यंदाच्या मोसमातला बंगळुरूचा सलग सहावा पराभव ठरला आहे. यानंतर आता बंगळुरूचा आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं बंगळुरूचं स्वप्न धुसर झालं आहे. त्यामुळे आता विराटला आराम देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विराटसारख्या महत्वाच्या खेळाडूला विश्रांती देत आपण समजूतदार असल्याचे दाखवून द्यावे, असा सल्ला इंग्लडंचा माजी कर्णधार मायकल वॉनने दिला आहे. 

 

 

मायकल वॉर्न आपल्या ट्विटमध्ये म्हणाला की, 'बंगळुरूचा हा सलग सहावा पराभव झाल्याने बंगळुरूचं या पर्वातील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. बीसीसीआयने समजूतदारपणा दाखवत वर्ल्ड कपआधी विराटला आराम दिला पाहिजे. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेच्या आधी विराटला थोडा वेळ द्यायला हवा'. 

वर्ल्ड कपला येत्या ३० मे पासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्ल्ड कपचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले आहे.

मायकल वॉर्नच्या या ट्विटला काही भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सुनावले आहे. तुझा सल्ला तुझ्याकडेच ठेव, विराट एक महान खेळाडू आहे. तो चांगली कामगिरी करत आहे. त्याला चांगली साथ देण्यासाठी टीम इंडियामध्ये धोनीसारखा दिग्गज आणि अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे तू आपल्या टीमकडे लक्ष दे. असा खोचक सल्ला मायकल वॉर्नला दिला आहे.

भारताचा माजी खेळाडू हेमांग बदानीने ट्वीट करत विराटसाठी खंत व्यक्त केली आहे. 'विराटबद्दल विचार करताना फार वाईट वाटत आहे. विराट वगळता उर्वरित बंगळुरू टीमच्या खेळाडूंनी आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी केली नाही. पुढील मॅचमध्ये हे खेळाडू चांगली कामगिरी करुन विराटच्या नेतृत्वात विजय दाखल करुन देतील अशी आशा आहे.' असे ट्विट हेमांग बदानीने केले.

कोहलीची कामगिरी

बंगळुरू टीमला आतापर्यंत जरी एकही विजय मिळवता आला नाही. असे असले तरी देखील विराटने याचा परिणाम आपल्या खेळीवर होऊ दिलेला नाही. विराटने खेळलेल्या एकूण ६ मॅचमध्ये २०३ रन केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. आयपीएल २०१९ मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत विराट ५व्या क्रमांकावर आहे. 

बीसीसीआयची भूमिका

आपल्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर विश्रांती द्यायची की नाही, याबद्दल बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खेळाडूंना आराम देण्यासाठी बीसीसीआय कोणत्याही प्रकारे टीम फ्रेंचायजीवर दबाव टाकणार नाही. हा निर्णय स्वतंत्रपणे संबंधित फ्रेंचायजी आणि खेळाडूचा आहे. आपण कशाला प्रथम प्राधान्य द्यायला हवे, हे त्या त्या खेळाडूंनीच ठरवायला हवे, असं बीसीसीआयने याआधीच स्पष्ट केलं होतं.