FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय

भारतात क्रिकेट व्यतिरिक्त कोणताच खेळ हवा तितका लोकप्रिय नाही. अनेकदा मोठ्या स्पर्धा आल्या की त्या खेळाबद्दल चर्चा रंगते. खासकरून ऑलिम्पिक आणि फूटबॉल स्पर्धा असल्या की भारतीय संघ आहे की नाही? याबाबत बोललं जातं. इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात खेळाची अशी स्थिती पाहून अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं.

Updated: Nov 11, 2022, 06:16 PM IST
FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय title=

How Indian Team Play In FIFA World Cup: भारतात क्रिकेट व्यतिरिक्त कोणताच खेळ हवा तितका लोकप्रिय नाही. अनेकदा मोठ्या स्पर्धा आल्या की त्या खेळाबद्दल चर्चा रंगते. खासकरून ऑलिम्पिक आणि फूटबॉल स्पर्धा असल्या की भारतीय संघ आहे की नाही? याबाबत बोललं जातं. इतकी लोकसंख्या असणाऱ्या देशात खेळाची अशी स्थिती पाहून अनेकदा आश्चर्य व्यक्त केलं जातं. फुटबॉल, रग्बी, बेसबॉल या खेळात भारताचं अस्तित्वच नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आता फुटबॉल वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) स्पर्धा असल्याने फुटबॉलबाबत चर्चा रंगली आहे. 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फीफा वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार असून 18 डिसेंबरला अंतिम सामना खेळला जाणार आहे. पण या 32 संघात भारताचं नाव नाही. 

भारतीय फुटबॉल संघाने फीफा वर्ल्डकप स्पर्धेत एकदाच क्वालिफाय केलं होतं. 1950 साली क्वालिफाय केलं खरं पण स्पर्धेत खेळू शकला नाही. कदाचित भारतीय संघ तेव्हा खेळला असता तर आज वेगळं चित्र असतं. आपल्या फूटबॉलपटूंना विना शूज फूटबॉल खेळण्याची सवय होती. त्यामुळे त्यांनी खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर आजपर्यंत भारतीय संघ फीफा वर्ल्डकपमध्ये क्वालिफाय होऊ शकला नाही. 

वर्ल्डकप स्पर्धेत क्वालिफाय होण्यासाठी काय करावं?

फीफा वर्ल्डकपसाठी आशियातील 4.5 संघाना स्थान देण्यात आलं आहे. चार संघ थेट क्वालिफाय करतात. तर एका संघाला दक्षिण अमेरिकेतील संघाशी सामना करावा लागतो. त्यातील विजयी संघाला वर्ल्डकपचं तिकीट मिळतं. आशिया फुटबॉल संघातील 46 संघांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामने होतात. त्यानंतर टॉप चार संघांना वर्ल्डकपमध्ये एन्ट्री मिळते. तर एका संघासाठी इंटर-कॉन्फेडेरेशन प्लेऑफ सामना खेळला जातो.

FIFA World Cup स्पर्धेसाठी भारतीय संघ क्वालिफाय झाला होता, पण...

पहिली फेरी- पहिल्या फेरीत आशिया फुटबॉल रॅकिंगमधील 35 पासून पुढे 46 पर्यंत असलेल्या 12 संघांमध्ये सामने होतात. एक संघ दुसऱ्या टीमसोबत 2-2 (होम आणि अवे) सामने खेळतो. टॉप 6 संघांना दुसऱ्या फेरीत स्थान मिळतं.

दुसरी फेरी- 1 ते 34  रॅकिंगमधील एकूण 34 संघ आणि पहिल्या फेरीतील क्वालिफाय झालेल्या 6 संघ दुसऱ्या फेरीत खेळतात. म्हणजेच एकूण 40 संघ दुसऱ्या फेरीत खेळतात. 40 संघांची आठ गटात विभागणी केली जाते. प्रत्येक संघ आपल्या गटात 2-2 मॅच (होम आणि अवे) खेळते. प्रत्येक गटातील टॉपच्या आठ संघ आणि संपूर्ण गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या टॉप चार संघांना तिसऱ्या फेरीत स्थान मिळतं. म्हणजेच 8 + 4= 12 संघ तिसऱ्या फेरीत जातात.

तिसरी फेरी- तिसऱ्या फेरीत 6-6 असे दोन गट केले जातात .या गटातही प्रत्येकत संघ 2-2 मॅच (होम आणि अवे) खेळते. दोन्ही गटातील टॉप दोन संघ वर्ल्डकपसाठी क्वालिफाय करतात. तर दोन्ही गटातील तिसऱ्या क्रमांकाची टीम चौथ्या फेरीसाठी खेळतात.

चौथी फेरी- चौथ्या फेरीत दोन संघांमध्ये एक सामना होतो. या सामन्यात जिंकणाऱ्या संघाला टीम इंटर कॉन्फेडेरेशन अंतर्गत क्वालिफाय केलं जातं.

पाचवी फेरी- आता टीम इंटर कॉन्फेडेरेशनमध्ये क्वालिफाय झालेला संघ दक्षिण अमेरिकेतील प्लेऑफ संघासोबत सामना खेळतो. त्यातील विजयी संघाला वर्ल्डकपचं तिकीट मिळतं.