उमेश यादवची एक चूक भारताला महाग पडली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला.

Updated: Feb 24, 2019, 11:26 PM IST
उमेश यादवची एक चूक भारताला महाग पडली title=

विशाखापट्टणम : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला. भारतानं ठेवलेल्या १२७ रनचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियानं २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून १२७ रन केले. यामुळे ऑस्ट्रेलियानं ही मॅच ३ विकेटनं जिंकली. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियानं २ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे.

२० ओव्हरमध्ये १२६/७ एवढीच धावसंख्या करणाऱ्या भारतानं बॉलिंगमध्ये चांगली कामगिरी केली. पण शेवटच्या ओव्हरमध्ये उमेश यादवनं केलेली एक चूक भारताला महागात पडल्याचं म्हणावं लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १४ रनची आवश्यकता होती. उमेश यादवच्या पहिल्या बॉलला ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनं एक रन काढून जे रिचर्डसनला स्ट्राईक दिली. यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला जे रिचर्डसननं फोर मारली. यानंतर तिसऱ्या बॉलवर जिकडे एकच रन जायला पाहिजे तिकडे उमेश यादवनं दोन रन दिले. तिसऱ्या बॉलवर जे रिचर्डसननं लाँग ऑनच्या दिशेनं बॉल मारला. हा बॉल घेण्यासाठी उमेश यादवनं पुढाकार घेतला नाही. त्यामुळे जे रिचर्डसननं एक ऐवजी दोन रन घेतले. उमेश यादवनं दिलेली ही एक रन भारतला महागात पडली.

यानंतर चौथ्या बॉलवर रिचर्डसननं एक रन काढून पॅट कमिन्सला स्ट्राईक दिला. पाचव्या बॉलवर पॅट कमिन्सनं फोर मारल्यामुळे आता ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १ बॉलमध्ये २ रनचं आव्हान होतं. मग शेवटच्या बॉलवर पॅट कमिन्सनं २ रन काढून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.