पाचव्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय, सीरिजही जिंकली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा अगदी सहज विजय झाला आहे.

Updated: Nov 1, 2018, 05:10 PM IST
पाचव्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय, सीरिजही जिंकली title=

तिरुवनंतपुरम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा अगदी सहज विजय झाला आहे. वेस्ट इंडिजनं ठेवलेल्या १०५ रनचा पाठलाग भारतानं १४.५ ओव्हरमध्ये एक विकेट गमावून केला. १०५ रनचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच शिखर धवनच्या रुपात एकमेव धक्का बसला. शिखर धवन ६ रनवर आऊट झाला. तर रोहित शर्मा नाबाद ६३ आणि विराट कोहली नाबाद ३३ रनवर राहिला. ५ मॅचच्या या सीरिजमध्ये रोहितनं २ शतकं आणि १ अर्धशतक केलं. तर विराट कोहलीनं पहिल्या तिन्ही मॅचमध्ये शतकं केली होती.

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगाशी आला. सुरुवातीपासूनच भारतीय बॉलरनी वेस्ट इंडिजला धक्के दिले. भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि खलील अहमदला प्रत्येकी २-२ विकेट घेण्यात यश आलं. भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरनं सर्वाधिक २५ रन केले. तर मार्लोन सॅम्युअल्सला २४ रन करता आले. वेस्ट इंडिजचे तीन बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले.

घरच्या मैदानात भारताचा हा लागोपाठ सातवा वनडे सीरिज विजय आहे. ऑक्टोबर २०१५ पासून भारत घरच्या मैदानात एकही वनडे सीरिज हरलेला नाही. दक्षिण आफ्रिकेनं २०१५ मध्ये भारताला घरच्या मैदानात मात दिली होती.