IPL 2019: धोनीने टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी का फिल्डिंग? आयआयटी मद्रासचा ५ मार्कांचा प्रश्न!

आयपीएल २०१९ मधला पहिला प्ले-ऑफचा सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे.

Updated: May 7, 2019, 06:36 PM IST
IPL 2019: धोनीने टॉस जिंकून बॅटिंग घ्यावी का फिल्डिंग? आयआयटी मद्रासचा ५ मार्कांचा प्रश्न! title=

चेन्नई : आयपीएल २०१९ मधला पहिला प्ले-ऑफचा सामना थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. या सामन्याबद्दल मुंबई आणि चेन्नईच्या क्रिकेट रसिकांमध्ये कमालीचा उत्साह आहे. या उत्साहामध्ये मद्रास आयआयटीही मागे नाही. टॉस जिंकल्यानंतर धोनीने बॅटिंग घ्यावी का बॉलिंग? असा सवाल आयआयटी मद्रासने प्रश्नपत्रिकेत विचारला आहे.

आयसीसीने ही प्रश्नपत्रिका ट्विट केली आहे. खऱ्या आयुष्याशी निगडित प्रश्न विचारणाऱ्या मद्रास आयआयटीचे प्रोफेसर विग्नेश यांचं अभिनंदन, असं ट्विट आयसीसीने केलं आहे. ४० मार्कांच्या या परिक्षेत मद्रास आयआयटीने या प्रश्नाला ५ मार्क दिले आहेत.

काय आहे प्रश्न?

डे-नाईट क्रिकेट मॅचमध्ये दव महत्त्वाची भूमिका बजावतं. मैदानातल्या गवतावर प्रमाणापेक्षा जास्त असलेलं दव बॉल ओला करतं, यामुळे स्पिनरना बॉल पकडणं अवघड होतं. तर फास्ट बॉलरना इच्छूक टप्प्यावर बॉल टाकणं आव्हान ठरतं. यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमचं नुकसान होतं. ७ मेच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार चेन्नईमध्ये हवेची आद्रता ७० टक्के असण्याचा अंदाज आहे. खेळाच्या सुरुवातीला तापमान ३९ अंश असेल, तर दुसऱ्या इनिंगवेळी हे तापमान २७ अंश होईल. या माहितीनंतर धोनीने पहिले बॅटिंग घ्यावी का फिल्डिंग? याबद्दल कोणता सल्ला द्याल? तुमच्या उत्तराचं योग्य समर्थन करा. योग्य समर्थन नसेल तर एकही मार्क मिळणार नाही. असा प्रश्न आयआयटी मद्रासने विचारला आहे.