भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये झाली मोठी चूक

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर ६ रन्सने विजय मिळवला

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 10, 2017, 12:24 PM IST
भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये झाली मोठी चूक title=
File Image: BCCI

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात ७ नोव्हेंबर रोजी तिरुअनंतपुरममध्ये शेवटची टी-२० मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर ६ रन्सने विजय मिळवला.

शेवटच्या टी-२० मॅचमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने सीरिज २-१ ने आपल्या नावावर केली. मात्र, या मॅचमध्ये एक मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे.

शेवटच्या मॅचमध्ये मिळालेल्या विजयामुळे या चुकीकडे कदाचित कुणाचं लक्षचं गेलं नसेल. मात्र, नंतर ही चूक लक्षात आली आणि मग माफीही मागण्यात आली. तसेच भविष्यात अशी चूक पून्हा होणार नाही असं आश्वासनही देण्यात आलं.

नियमाप्रमाणे मॅचपूर्वी राष्ट्रगीत गायले जाते. पण, तिरुअनंतपुरममध्ये खेळण्यात आलेल्या मॅचपूर्वी केरळ क्रिकेट असोसिएशनने (केसीए) दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गायलं गेलं नाही. त्यानंतर केसीएने आपली चूक झाल्याचं मान्य केलं.

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, केसीएचे सेक्रेटरी जयेश जॉर्ज यांनी आपली चूक झाल्याचं मान्य करत म्हटलं की, "दोन्ही देशाचं राष्ट्रगीत गायलं गेलं नाही. अधिकारी आणि ऑर्गनायर्झस इतक्या गडबडीत होते की कुणाच्याच लक्षात आलं नाही. ही आमची मोठी चूक होती आणि याबाबत आम्ही माफी मागतो, पून्हा असं होणार नाही".

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये मंगळवारी टीम इंडियाने न्यूझीलंडचा सहा रन्सने पराभव केला. या विजयासोबतच टीम इंडियाने ही सीरिज २-१ ने आपल्या नावावर केली. पावसामुळे ही मॅच २० ओव्हर्सऐवजी ८-८ ओव्हर्सची खेळवण्यात आली होती.