'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला

Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यातील पराभावाला 4 दिवस होत नाही तोच ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका सुरु होत असून संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 23, 2023, 09:29 AM IST
'सावरायला वेळ लागेल, रोहित ड्रेसिंग रुममध्ये..'; सूर्यकुमार WC Final मधील पराभवाबद्दल स्पष्टच बोलला title=
पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या भावना

Suryakumar Yadav On India Losing World Cup 2023: भारतीय संघाचा वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात अनपेक्षितरित्या पराभव झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसांमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळवली जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेमध्ये वर्ल्ड कपमधील पराभवासंदर्भात भाष्य केलं. तसेच कर्णधार रोहित शर्माबद्दलही सूर्यकुमारने आपलं मत मांडताना त्याची कामगिरी फारच उत्तम झाली असं म्हटलं आहे. तसेच या स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून आपली भूमिका सूर्यकुमारने स्पष्ट केली आहे.

रोहित शर्माच्या वर्ल्ड कपमधील खेळीबद्दल सूर्याचं विधान

सूर्यकुमारला वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्याने रोहित शर्माचा उल्लेख करत आपलं मत मांडलं. "वर्ल्ड कप फायनलमधील पराभव हा फारच निराशाजनक आहे. मात्र तुम्ही मागे वळून वर्ल्ड कपमधील संघाच्या प्रवासाकडे पाहिल्यास नक्कीच ही स्पर्धा भारतासाठी फारच उत्तम राहिली असं म्हणता येईल. आम्ही ज्याप्रकारे मैदानात खेळतो त्यावर प्रत्येक खेळाडू, सपोर्टींग स्टाफ, संपूर्ण देशाबरोबरच आम्हालाही अभिमान वाटतोय. आम्ही 10 सामने जिंकलो. रोहित शर्माने कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून उत्तम कामगिरी केली. त्याच्याकडून फार काही शिकता आलं. तो जे ड्रेसिंग रुममध्ये बोलायचा ते तो मैदानात करुन दाखवत होता. हे फारच प्रेरणादायी आहे. अपेक्षा आहे की आम्हीही अशी कामगिरी (या सिरीजमध्ये) करु," असं सूर्यकुमार म्हणाला.

सावरण्यासाठी वेळ लागेल

तसेच वर्ल्ड कप फायनलमधील पराभव सहज विसरता येणार नाही असंही सूर्याने म्हटलं. "फायलनमध्ये झालेल्या या पराभवामधून सावरण्यासाठी वेळ लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जे काही झालं ते विसरुन जाऊयात, असं होत नाही. ही स्पर्धा फार मोठी होती," असं सूर्यकुमार म्हणाला. 

नक्की वाचा >> 'मी सगळ्यांना एकच गोष्टी सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला

मी सुद्धा तरुण

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्यात आल्यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना सूर्यकुमारने हसत, 'मी सुद्धा तरुण आहे,' असं म्हटलं. "प्रत्येक खेळाडूला मैदानावर उतरल्यानंतर स्वार्थी होऊ न खेळावं लागेल, हे मी आताच स्पष्ट करु इच्छितो," असंही सूर्यकुमारने स्पष्ट केलं. "मैदानात गेल्यानंतर खेळाचा आनंद घ्या. काही वेगळं करण्याची गरज नाही. कारण काहीही झालं तर शेवटी हा एक क्रिकेटचा सामनाच आहे, असं मी खेळाडूंना सांगितलं," अशा शब्दांमध्ये आपण संघाकडे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्याचं सूर्यकुमारने सांगितलं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अशी आहे भारतीय टीम-

सूर्यकुमार यादव (कर्णधार) , ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार