'क्रिकेट सोड आणि वडिलांबरोबर रिक्षा चालव'

मोहम्मद सिराजसाठी भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता, आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सिराजवर सातत्याने टीका होत होती

Updated: Feb 8, 2022, 09:38 PM IST
'क्रिकेट सोड आणि वडिलांबरोबर रिक्षा चालव'  title=

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसाठी भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळणाऱ्या सिराजवर स्पर्धेतील खराब कामगिरीमुळे सातत्याने टीका होत होती. सुरुवातीला त्याला संघातून वगळण्याचीही मागणी झाली, पण विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास ठेवला.

आता तो केवळ आरसीबीचाच नाही तर भारतीय संघाचाही प्रमुख गोलंदाज बनला आहे. सिराजने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की, त्याला 2019 मध्ये क्रिकेट सोडून वडिलांसोबत ऑटो चालवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

आयपीएलमध्ये खराब सुरुवात
सिराजने 2019 च्या आयपीएल हंगामात नऊ सामन्यांमध्ये 10 च्या इकॉनॉमी रेटने फक्त सात विकेट घेतल्या होत्या. त्या मोसमातील पहिल्या सहा सामन्यांमध्ये बेंगळुरूच्या संघाला फक्त एकच सामना जिंकता आला होता. यामुळे बंगलोरचा संघ पॉईंटटेबलमध्येही तळाला होता.  कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सिराजच्या गोलंदाजीवर 2 षटकात पाच षटकार ठोकले होते. यावेळी त्याने एकूण 36 धावा दिल्या. हे कमी काय म्हणून दोन बीमर टाकल्यामुळे त्याला गोलंदाजीतूनही वगळण्यात आलं.

त्या सामन्याची आठवण करून देताना सिराजने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं, बीमर गोलंदाजी केल्यानंतर लोकांनी त्याच्यावर खूप टीका केली. त्याला क्रिकेट सोडून वडिलांसोबत ऑटो चालवण्याचा सल्ला देण्यात आला. पण लोकांनी माझा संघर्ष पाहिलेला नाही. जेव्हा माझी पहिल्यांदा टीम इंडियासाठी निवड झाली तेव्हा माही भाईने (M S DHONI) मला माझ्या करिअरबाबत महत्त्वाचा सल्ला दिला होता. 

सीराजला धोणीचा मोलाचा सल्ला
लोक काय बोलत आहेत याकडे लक्ष देऊ नकोस, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा तेच लोक तुमची प्रशंसा करतात. पण खराब कामगिरी झाली की हिच लोकं नाव ठेवता, अशा प्रतिक्रिया कधीच गांभार्याने घेऊ नयेत असा सल्ला त्यावेळी धोणीने सीराजला दिला.

माही भाईचे हे विधान खरं ठरले आहे. मला ट्रोल करणारे लोक नंतर म्हणतात की तू सर्वोत्तम गोलंदाज आहेस. त्यामुळे आता कोणाच्याही प्रतिक्रियेचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही, असं सीराजने या मुलाखतीत म्हटलं. आयपीएल 2022 साठी आरसीबीने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी सिराज एक आहे. फ्रँचायझीने विराट कोहली (15 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (11 कोटी) आणि मोहम्मद सिराज (7 कोटी) यांना कायम ठेवलं आहे.

सिराजच्या वडिलांनी ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. सिराज त्यावेळी टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात होता. तो अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नाही.