लोक काही नेत्यांची भाषणे फक्त ऐकायला जातात; पवारांचा राज ठाकरेंना टोला

काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

Updated: Feb 11, 2020, 04:45 PM IST
लोक काही नेत्यांची भाषणे फक्त ऐकायला जातात; पवारांचा राज ठाकरेंना टोला title=

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (CAA)समर्थन केले होते. CAA विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी यापुढे जास्त नाटकं केली तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ, असे विधान त्यांनी केले होते. 

याविषयी शरद पवार यांना आजच्या पत्रकारपरिषदेत विचारणा करण्यात आली. यावेळी पवारांनी म्हटले की, काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. लोक फक्त या नेत्यांची भाषणे ऐकायला आणि पाहायला येतात, असा टोला यावेळी पवारांनी लगावला. त्यामुळे आता 'मनसे'कडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

'आता फक्त मोर्चा काढलाय.... यापुढे तलवारीला तलवारीनेच उत्तर देऊ'

तत्पूर्वी शरद पवार यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिल्ली निवडणुकीच्या निकालासंदर्भातही भाष्य केले. दिल्लीचे निकाल हे मोदी-शहा कॉम्बिनेशनला नाकारणारे आहेत. देशातील लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकांनी भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या निकालांमुळे यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

मोर्चे काढून कोणाला ताकद दाखवताय; राज ठाकरेंचा मुस्लिमांना सवाल

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी ६७ जागांवर 'आप'ने बाजी मारली होती. यंदाही 'आप'कडून अशाच कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने दिल्लीत अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली केलेला आक्रमक प्रचार पूर्णपण निष्प्रभ ठरल्याचे सिद्ध झाले.