मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं का आहे ऐतिहासिक?

भारताच्या कुटनीतीचा हा मोठा विजय आहे.

Updated: May 1, 2019, 07:28 PM IST
मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं का आहे ऐतिहासिक? title=

मुंबई : दहशतवादाच्या विरोधात लढत असलेल्या भारताला मोठं यश मिळालं आहे. एका मोठ्या लढाईनंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मौलाना मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. आतापर्यंत चीन यामध्ये अडथळा बनला होता. पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे अखेर चीन देखील विटो हटण्यासाठी तयार झाला आहे. 

हा भारताच्या कुटनीतीचा ऐतिहासिक विजय आहे. कारण पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. भारताने आतापर्यंत लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी हाफिज़ सईदला देखील आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी केली होती. हाफिज सईद मुंबई हल्ल्यातील आरोपी आहे. पण मौलाना मसूद अजहरचं प्रकरण वेगळं होतं.

काश्मीरमधील कारवायांशी मसूदचा संबंध

पाकिस्तानचा नागरिक असलेला मसूद अजहरचा इतिहास जम्मू-काश्मीरपासून सुरु होतो. कंधार कांडमध्ये त्यानंतर पुलवामामध्ये झालेल्या दहशवतादी हल्ल्यात मसूदचा हात होता. मसूद अजहर जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३० वर्षापासून भारत विरोधी कारवाया करत आहे. १९९४ मध्ये त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आलं होतं. पण कंधार विमान अपहरण प्रकरणात त्याला सोडावं लागलं होतं. त्यामुळे भारतासाठी तो चिंतेचा विषय बनला होता.

भारतातून सुटल्यानंतर मसूद अजहरने जैश-ए-मोहम्मद नावाची संघटना तयार केली. त्यानंतर भारतात दहशतवादी कारवाया त्याने सुरु केल्या.

२००१ मध्ये संसदेवर हल्ला, २०१६ मध्ये पठानकोट हल्ला, २०१९ मध्ये पुलवामा हल्ला यामध्ये मसूदचा हात होता. संपूर्ण जग या दहशतवादी हल्ल्यामुळे हादरला होता. काश्मीरमध्ये अनेक छोट्या मोठ्या कारवाईंसाठी देखील मसूद जबाबदार होता.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा वाढत असल्याने मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणं ही एक मोठी घटना आहे. काश्मीरमध्ये इतर देशांनी हस्तक्षेप करावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करतो आहे. पण भारताने हे होऊ दिलं नाही.