परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सौदी अरेबिया पोहोचताच पाकिस्तानात खळबळ, पाहा काय आहे कारण

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे माजी मुत्सद्दी अब्दुल बासित यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Sep 12, 2022, 02:20 PM IST
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सौदी अरेबिया पोहोचताच पाकिस्तानात खळबळ, पाहा काय आहे कारण title=

मुंबई : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S Jaishankar) पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर (Saudi Arabia Visit) गेले आहेत. त्यांनी जेद्दाहमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan) मात्र खळबळ उडाली आहे. भारताचे आखाती देशांशी संबंध मजबूत होत असल्याने पाकिस्तान चिंतेत आहे. (India's External Affairs Minister S Jaishankar in Saudi Arabia for an official visit.)

पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित म्हणाले की, भारताने आखाती देशांमध्ये, विशेषत: सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये (UAE) जे अवकाश निर्माण केले आहे, त्याचा पाकिस्तानने (Pakistan) गांभीर्याने विचार केला पाहिजे. अब्दुल बासित पुढे म्हणाले की, आखाती देशांशी भारताच्या संबंधांशी आमचा (पाकिस्तान) थेट संबंध नाही. पण आखाती देशांशी भारताचे चांगले संबंध हे आपल्या हिताच्या दृष्टीने परिणामकारण आहेत.

पाकिस्तानच्या मुत्सद्देगिरीत आपल्याला या गोष्टी समजतील एवढी समज असायला हवी, असे माजी मुत्सद्दी अधिकारी म्हणाले. आखाती देशांमध्ये भारत जे काही करत आहे त्याचा पाकिस्तानच्या संबंधांवर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून पाकिस्तानने या विषयांवर सौदी अरेबिया आणि यूएईशी चर्चा करावी. यामुळे पाकिस्तानचे हित धोक्यात येत असेल तर ते आमचे अपयश असेल, असेही अब्दुल बासित पुढे म्हणाले.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जेद्दाहमध्ये सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांच्याशी झालेल्या भेटीबाबत ट्विट केले. परराष्ट्र मंत्रालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की, रविवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सौदीच्या राजकुमारांची भेट घेतली. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची सौदी अरेबियाची ही पहिली अधिकृत भेट आहे.
 
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने असे सांगण्यात आले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि सौदी अरेबियामधील राजकीय, सुरक्षा, ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, अन्न, संस्कृती आणि संरक्षण क्षेत्रातील संबंध सातत्याने दृढ झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुढे सांगण्यात आले की, कोरोनाच्या काळातही दोन्ही देशांचे नेतृत्व एकमेकांच्या संपर्कात होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आखाती देशांशी भारताचे संबंध दृढ झाल्याचे अनेक परराष्ट्र धोरण तज्ज्ञांचे मत आहे. भारत अनेक क्षेत्रात विशेषतः सौदी अरेबिया आणि UAE सोबत व्यवसाय करत आहे. यासोबतच सौदी अरेबिया आणि यूएईमध्येही लाखो भारतीय लोक काम करत आहेत. याशिवाय लाखो भारतीय लोक कतार, ओमान आणि इतर आखाती देशांमध्ये पैसे कामासाठी जातात.

विशेषत: भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात कच्च्या तेलाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे पाश्चिमात्य देशांकडून आर्थिक निर्बंधांना सामोरे जात असलेला रशिया भारताला कवडीमोल दराने तेल विकत असूनही भारताला सौदी अरेबियाकडून समान तेलाचा पुरवठा केला जात आहे.

सरकारी आकडेवारीनुसार भारत 18 टक्के कच्च्या तेलाची आयात सौदीकडून करतो. सन 2021-22 मध्ये भारताने सौदी अरेबियातून $34 अब्ज किमतीच्या वस्तू आयात केल्या, तर $8.76 अब्ज किमतीच्या वस्तू भारतातून सौदी अरेबियाला निर्यात करण्यात आल्या.

2020-21 च्या तुलनेत भारतातून सौदी अरेबियाला होणारी निर्यात 49 टक्क्यांनी वाढली आहे. 2021-22 मध्ये भारताच्या एकूण व्यापारात सौदी अरेबियाचा वाटा 4.14 टक्के होता.

सौदी अरेबियाशी भारताची जवळीक वाढल्याने पाकिस्तान चिंतेत?

वास्तविक, गरजेच्या वेळी सौदी अरेबिया पाकिस्तानला मदत करत आहे. पण जेव्हा मोहम्मद बिन सलमान सौदीचे क्राऊन प्रिन्स झाले आणि दुसरीकडे इम्रान खान पाकिस्तानात सत्तेवर आले तेव्हा दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे सौहार्दपूर्ण राहिले नाहीत. दरम्यान, भारताचे सौदी अरेबियासोबतचे संबंध कालांतराने घट्ट होत गेले. सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक सातत्याने वाढत आहे.

सध्या पाकिस्तानशी सौदी अरेबियाचे संबंध प्रस्थापित असले तरी भारताची जवळीक पाहून पाकिस्तानला भीती वाटू लागली आहे. काश्मीरपासून (Kashmir) अनेक मुद्द्यांवर पाकिस्तानने आखाती देशांसह संपूर्ण जगासमोर भारताची धार्मिक दृष्ट्या भेदभाव करणारी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र त्याला यश आले नाही.

अशा परिस्थितीत आता सौदी, यूएई सारख्या बड्या आणि बलाढ्य इस्लामी देशांचे संबंध भारतासोबत चांगले असतील तर एका दृष्टिकोनातून ते पाकिस्तानचे आरोप गांभीर्याने घेत नाहीत. त्याचबरोबर पाकिस्तान आखाती देशांमध्ये अनेक प्रकारचे व्यवसायही करतो, अशा परिस्थितीत भारत आणि आखाती देशांमधील संबंध वाढले तर व्यापारात आणखी वाढ होईल, ज्यामुळे भविष्यात पाकिस्तानलाही फटका बसू शकतो.

बाकी आखाती देश सोडले तर सौदी अरेबियाशी भारताच्या संबंधांबद्दल बोलायचे झाले तर ते एक-दोन नव्हे तर अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून आहे. एकीकडे भारतातील लाखो लोक रोजगारासाठी सौदी अरेबियात जातात, तर दुसरीकडे भारत आणि सौदी अरेबियाच्या एकमेकांसोबत व्यवसाय करतात.

सौदी अरेबियाशी भारताचे संबंध नेहमीच चांगले राहिले असले, तरी गेल्या काही वर्षांत संबंध सुधारण्यामागील एक कारण म्हणजे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा पुरोगामी विचार.

Latest Marathi News, Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at 24taas.com