इम्रान खानचे पाकिस्तानच्या सेनेला आणि जनतेला सज्ज राहण्याचे आदेश

इम्रान खान यांची भारताला धमकी

Updated: Feb 26, 2019, 04:20 PM IST
इम्रान खानचे पाकिस्तानच्या सेनेला आणि जनतेला सज्ज राहण्याचे आदेश title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानने भारताला धमकी दिली आहे. इम्रान खानने पाकिस्तानच्या जनतेला आणि सेनेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान वेळ आल्यावर याचं उत्तर देईल. असं देखील इम्रान खानने म्हटलं आहे. भारताच्या कारवाईनंतर इम्रान खानने आपातकालीन बैठक बोलावली होती. भारतीय हवाईदलाच्या कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने संसदेचं विशेष सत्र बोलावलं आहे.

पाकिस्तानच्या संसदेत पडसाद

भारतीय वायुदलाने केलेल्या कारवाईनंतर त्याचा पडसाद पाकिस्तानच्या संसदेत देखील उमटले. विरोधी पक्षाने इम्रान खानवर टीका केली. शर्म करो असं नारे देखील दिले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशींनी म्हटलं की, भारताने नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानला उत्तर देण्याचा हक्क आहे.

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये कुरैशींनी म्हटलं की, 'आधी भारताने पाकिस्तानला उकवण्याचा प्रयत्न केला आहे. हे नियंत्रण रेषेचं उल्लंघन आहे. पाकिस्तान आपल्या आत्मरक्षणासाठी याचं उत्तर देईल.'

भारतीय वायुदलाने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर जैश ए मोहम्मदचे ठिकाणं आणि ट्रेनिंग कॅम्प उद्धवस्त झाले आहेत. भारताने पाकिस्तानच्या बालाकोट, मुजफ्फराबाद आणि चकोठीमध्ये ही कारवाई केली. एएनआय न्यूज एजेंसीच्या माहितीनुसार, इंटेलिजेंसच्या आधारावर दहशतवाद्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. बालाकोट येथील सुसाईड बॉम्बिंग ट्रेनिंग सेंटर भारताने पूर्णपणे नष्ट केले आहेत.