भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया

तालिबानकडून भारतासोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे   

Updated: Aug 16, 2021, 08:25 PM IST
भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया title=
छाया सौजन्- ट्विटर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afganistan) सुरु असणाऱ्या दहशतीच्या वातावरणातच प्रत्येक क्षणाला थरकाप उडवणारी दृश्य साऱ्या जगासमोर येत आहेत. परिस्थिती प्रत्येक क्षणाला चिघळत जात असतानाच आता तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यानं भारतासोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

अफगाणिस्तानात तालिबाननं (Taliban) देशाचा ताबा घेण्यास पावलं उचलली असतानाच याचे देशावर काय परिणाम होणार यासंबंधीचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच खुदद् तालिबानकडूनच या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. 

भारतासोबत आम्ही.... 
तालिबानच्या प्रवक्त्यानं भारतासोबत आम्ही चांगलं नातं प्रस्थापित करु इच्छितो असं म्हटलं आहे. शिवाय सर्व राजकीय नेतेमंडळी देशात सुरक्षित असून, त्यांना देश सोडून जाण्याची गरज नाही, असंही तो म्हणाला. 

भारत- पाकिस्तान मुद्द्यावर म्हणाला... 
एकिकडे भारतासोबत चांगले नातेसंबंध प्रस्थापित करु पाहणाऱ्या तालिबाननं भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर आपण हस्तक्षेप करु इच्छित नाही, कारण हा त्या दोन्ही राष्ट्रांमधील मुद्दा आहे. सध्या कोणालाही देश सोडण्याची गरज नाही. 

Afganistan Video Viral : अफगाणिस्तानात ''मरो या भागो'', विमानाला लटकलेले २ असे खाली पडले 

भारताची नेमकी भूमिका काय? 
शेजारी राष्ट्र होण्याच्या नात्यानं भारत अफगाणिस्तानमध्ये लोकशाही पुन्हा सक्रिय करण्यासाठी आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु शांततेच्या मार्गाला तालिबानचा मात्र विरोध दिसून येत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताशी चांगलं नातं पुढे नेऊ पाहणाऱ्या तालिबानच्या या भूमिकेवर अनेक प्रश्नही उभे राहत आहेत.