15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार - उदय सामंत

महाराष्ट्र राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेपाठोपाठ आता महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: Feb 3, 2021, 05:51 PM IST
15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार - उदय सामंत  title=

मुंबई : राज्य सरकारने (Maharashtra Government) शाळेपाठोपाठ आता महाविद्यालये (Colleges) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता दिली आहे, असे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले. बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी असणार आहे. विद्यालये सुरू होताना वसतीगृहे सुरू करताना ती टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असे सामंत म्हणाले.

राज्यात 15 फेब्रुवारीपासून फक्त कॉलेज सुरू होतील. परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असे सांगण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात गेले आहेत त्यांना शिक्षण ऑफलाइन घ्यायचे की ऑनलाईन याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. तसेच स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडिट करूनच वसतीगृहे सुरू होणार आहेत, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.