#MeToo : बलात्काराचं दृश्य साकारातना अभिनेत्रीने नाही, आता अभिनेत्याने ठेवल्या 'या' अटी

रेप सीन नको रे बाबा...

Updated: Oct 16, 2018, 03:50 PM IST
#MeToo : बलात्काराचं दृश्य साकारातना अभिनेत्रीने नाही, आता अभिनेत्याने ठेवल्या 'या' अटी title=

मुंबई: लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणी आता महिलांनी एल्गार पुकारला असून, सर्वत्र याच विषयाची चर्चा सुरु आहे. कलाविश्वावर या साऱ्याचे थेट आणि सर्वाधिक परिणाम दिसत असून आता #MeToo चळवळीला मिळालेलं गंभीर वळण पाहता सेलिब्रिटींमध्येही याविषयीची दहशत पाहायला मिळत आहे. 

बलात्काराचं दृश्य असो किंवा मग छेडछाडीचं; त्या दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी ते वगळण्याचा आग्रह सेलिब्रिटींकडून करण्यात येत आहे. 

दृश्य वगळण्याची मागणी निर्माते- दिग्दर्शकांकडे करण्यात येत आहे. असं करणं शक्य नसल्यास दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी किंवा चित्रीकरणानंतर संपूर्ण टीमच्या उपस्थितीत अभिनेत्रींकडून ना हरकत (नो ऑब्जेक्शन) पत्रक लिहून घेण्याची मागणी कलाकार करत असल्याचंही कळत आहे. 

अभिनेते दलीप ताहिल यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही याचा प्रत्यय आला. 

सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटामध्ये ते व्यग्र आहेत. पण, ज्यावेळी या चित्रपटात बलात्कारंच दृश्य असणार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी या दृश्यास स्पष्ट नकार दिला. 

चित्रपटाच्या दृष्टीने हे दृश्य वगळणं अशक्य असल्यामुळे अखेर या दृश्यासाठी तयार झाले.

त्यांनी हे दृश्य करण्याची तयारी दर्शवली पण, त्यासाठीसुद्धा त्यांनी एक अट ठेवली. ज्या अभिनेत्रीसोबत दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं तिने एका पत्रकावर चित्रीकरणादरम्यान तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही असं त्या पत्रकात नमूद करणं अपेक्षित होतं. 

चित्रीकरणानंतर लगेचच त्या महिला कलाकाराची व्हिडिओ मुलाखतही घेण्यात आली, ज्यामध्ये तिने चित्रीकरणादरम्यान आपल्याला कोणतीच अडचण आली नसल्याचं स्पष्ट केलं. 

हिंदी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. 

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर एकामागोमाग काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 

आतापर्यंत आलोकनाथ, कैलाश खेर, वरुण ग्रोवर, विकास बहल, चेतन भगत, रजत कपूर, सुभाष घई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावण्यात आले आहेत. येत्या काळात हे प्रकरण कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.