'स्वराज्यरक्षक संभाजी'विषयी अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा

 प्रेक्षक म्हणून आपल्याला.... 

Updated: Feb 6, 2020, 07:01 PM IST
'स्वराज्यरक्षक संभाजी'विषयी अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा  title=
स्वराज्यरक्षक संभाजी

मुंबई : काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर प्रदर्शित होणारी, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मालिका 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं गेलं. ज्यानंतर ही मालिका नेमकी कोणत्या टप्प्यावर अंतिम वळण घेणार आणि नेमकी ती का बंद केली जात आहे असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. 

मालिकेविषयी होणाऱ्या या सर्व चर्चा पाहता अखेर खुद्द त्यामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनीच काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. मालिकेविषयी होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सूर त्यांनी आळवला आहे. 

सोशल मीडियावर एक ट्विट करत, अमोल कोल्हे यांनी 'गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नाही', असं म्हटलं आहे. 

वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी

ट्विटरवर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, ''अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसंदर्भात अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने टिप्पणी करावी. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु आहे याची नोंद घ्यावी'' असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.