पूजा भट्टसोबत ब्रेकअप का झाला? रणवीर शौरीने अखेर केला खुलासा, म्हणाला 'महेश भट्ट मुद्दामून आमच्या....'

रणवीर शौरीने (Ranvir Shorey) एका मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या तसंच तिच्या भावाने छळ केला असा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 18, 2024, 05:18 PM IST
पूजा भट्टसोबत ब्रेकअप का झाला? रणवीर शौरीने अखेर केला खुलासा, म्हणाला 'महेश भट्ट मुद्दामून आमच्या....' title=

बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी (Ranvir Shorey) बिग बॉसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. दरम्यान नुकतंच त्याने एका मुलाखतीत अभिनेत्री मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या आणि मी दारु पिऊन छळ कऱणारा आहे अशी प्रतिमा निर्माण केली असा आरोप त्याने केला आहे.

रणवीर शौरीने सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. पूजासोबत वाईट पद्धतीने ब्रेकअप हा आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण भाग होता कारण त्यात आपण शेवटी खलनायक ठरलो होतो अशी खंत त्याने व्यक्त केली. सना मकबुलकडून 'बिग बॉस ओटीटी 3' ट्रॉफी गमावलेल्या अभिनेत्याने सांगितलं की, "महेश भट्ट यांनी माझी प्रतिमा खराब केली. ते सुरुवातीला माझ्या वडिलांशी बोलले आणि आता सर्व काही सुरळीत आहे असं सांगितलं होतं. पण नंतर ते स्वत: तयार केलेल्या गोष्टी घेऊन मीडियाकडे गेले". 

पुढे तो म्हणाला की, "मला वाटतं की जेव्हा आमच्यात वाद झाला तेव्हा महेश भट्ट यांनी माझ्या मनात त्यांच्याबद्दल जो आदर आहे, त्याचा वापर कुशलतेने केला. जेव्हा भांडण झालं तेव्हा त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की, 'मुलांमध्ये जे काही भांडण झालं आहे, आपण हा वाद इथेच थांबवू. पुढच्या दिवशी त्यांनी माझ्याबद्दल अत्यंत खोट्य़ा गोष्टी छापल्या. त्यांनी मीडियात माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी मला एक मद्यपी व्यक्ती म्हणून चित्रित केलं".

रणवीर शौरीने पूजाच्या भावाने आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही केला, ज्यामुळे त्यांचं नातं अधिकच बिघडलं. तुझं फक्त पूजाशी भांडण झालं  होतं का असं विचारलं असता तो म्हणाला, "तिच्या भावानेच माझ्यावर हल्ला केला. तो (महेश भट्ट) या लोकांना असे बोलू नका असे सांगू शकला असता. या सर्व 25 वर्ष जुन्या गोष्टी आहेत, मला आता त्यात पडायचं नाही”.

रणवीर आणि पूजाने 2000 च्या सुरुवातीला एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यापूर्वी ते चांगले मित्र होते. यानंतर ते एकत्र राहू लागले. नंतर मात्र त्यांच्यातील नातं संपलं. पूजाने रणवीरवर शारिरीक हिंसाचार केल्याचा आरोप केला होता. रणवीरने अभिनेत्री कोंकणा सेन शर्माशी लग्न केलं. त्यांना 2011 मध्ये मुलगा झाला. 2015 मध्ये मात्र ते विभक्त झाले. दुसरीकडे पूजा 2014 मध्ये तिचा पती मनीष माखिजापासून विभक्त झाली.