उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक

हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना आणखी एक धक्कादायक घटना.

Updated: Oct 1, 2020, 08:06 AM IST
उत्तर प्रदेश : बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कारानंतर तरुणीचा मृत्यू, दोघांना अटक   title=

लखनऊ : हाथरस येथील १९ वर्षीय गरीब तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि खून केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत असताना, मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एका दुसर्‍या तरुणीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

हाथरस : अमानुष छळ आणि बलात्कार झालेल्या मुलीचा अंत

बलरामपूरच्या गायसरी गावात ही घटना घडली. २२ वर्षीय पीडित विद्यार्थी बीकॉमच्या द्वितीय वर्षात शिकत होती. विद्यार्थिनीनीवर तिच्या कॉलेजमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती एका खासगी कंपनीत नोकरी करत असे.

महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती घरी परत येत असताना तिचे अपहरण केले. बेशुद्ध अवस्थेत ती रिक्षातून घरी परत आली. तिची अवस्था वाईट झालेली होती. तिला उभी राहण्याची ताकदही नव्हती. अत्याचार करणाऱ्यांनी तिचे घरी येत असताना अपहरण केले, असा दावा पीडितेच्या कुटूंबाने केला आहे. मुलीची प्रकृती पाहून पालक काळजीत पडले आणि त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु तिचे रुग्णालयात जात असतानाच निधन झाले.

२२ वर्षीय पीडित तरुणीवर तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिला विषाचे इंजेक्शन देखील देण्यात आले होते, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ही मुलगी मंगळवारी वेळेवर घरी आली नाही म्हणून त्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. काही काळानंतर ती हाताला ग्लूकोज ड्रिपसह रिक्षातून घरी आली. त्यावेळी तिची प्रकृती अत्यंत नाजूक होती. बलरामपूर पोलीस अधीक्षक देव रंजन वर्मा यांनी सांगितले की, नातेवाईकांनी तिला रूग्णालयात नेले पण तिचा वाटेवर मृत्यू झाला.