Lakhimpur Kheri Violence : प्रियंकांची गांधी'गिरी'! हातात झाडू घेऊन केली गेस्ट हाऊसची साफसफाई

पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत गेस्ट हाऊसवर थांबवलं

Updated: Oct 4, 2021, 02:27 PM IST
Lakhimpur Kheri Violence : प्रियंकांची गांधी'गिरी'! हातात झाडू घेऊन केली गेस्ट हाऊसची साफसफाई title=

लखनऊ  : उत्तर प्रदेशाच्या लखमीपूर जिल्ह्यातील तिकुनीया गावात झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या (Lakhimpur Kheri Violence) घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पाहणीसाठी जात असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना मध्य रात्रीनंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. 

खोलीची साफसफाई

प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार होत्या. त्याआधीच त्यांना लखनऊमध्ये थांबवण्यात आलं. प्रियंका गांधी यांना सीतापूर (Sitapur) इथल्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं. या दरम्यान, त्यांचा हातात झाडून घेऊन खोली झाडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असून 5 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. यात संपूर्ण खोली रिकामी असून प्रियंका गांधी खोलीची साफसफाई करताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांची दमछाक

प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. प्रत्येक कोपऱ्यात नाकाबंदी, प्रत्येक रस्त्यावर अधिकाऱ्यांची फौज तैनात करण्यात आली होती. पण प्रियंका गांधी या सर्वांना चकवा देत पुढे निघून गेल्या. प्रियंका गांधी यांनी रस्ता बदलल्याचं कळताच त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान, पोलिसांनी प्रियंका गांधी यांच्याबरोबर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांवर आरोप

उत्तर प्रदेश पोलिसांनी ओढत नेल्याचा तसंच ढकलल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. पोलीस आणि प्रियंका गांधी यांच्यात वादावादीही झाली. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

'प्रियंका ते तुला घाबरले आहेत'

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यनंतर काँग्रे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विट केलं आहे. प्रियंका, मला माहित आहे की तू जराही मागे हटणार नाहीस, तुझ्या हिमतसमोर ते घाबरले आहेत, हिंसेच्या लढाईत देशातील अन्नदात्याला आपण विजय मिळवून देऊ, असं राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.