एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?

Millionaires Left India: देश सोडून जाणाऱ्यांनी वास्तव्य आणि करिअरसाठी कोणत्या देशाला दिलीये सर्वाधिक पसंती? पाहा संपूर्ण आकडेवारी आणि माहिती   

सायली पाटील | Updated: Sep 23, 2023, 09:26 AM IST
एकदोन नव्हे, तब्बल 6500 कोट्यधीश या वर्षी भारत सोडणार; कोणत्या देशात स्थायिक होतायत ही धनाढ्य मंडळी?  title=
approx 6500 millionaires to left india in 2023 know details

Millionaires Left India: नोकरीच्या निमित्तानं (job opportunities) किंवा शिक्षणाच्या (Education) निमित्तानं अनेकांनीच परदेशांना पसंती दिल्याचं आपण पाहिलं आहे. किंबहुना आपल्या ओळखीत किंवा कुटुंबातच अशी एखादी तरी व्यक्ती असते जी या कारणांसाठी परदेशवारीवर असते. ही व्यक्ती मायदेशी परतली की, तिच्याभोवती कुतूहलानं होणारा गराडाही आपण पाहिला असेल. पण, देशात परतणार नसलेल्यांचं काय? विचारात पडलात ना? मुळात स्वत:चा देश सोडून एका वेगळ्या देशात स्थायिक होणं, ही काही नवी बाब नाही. एका अहवालातून सध्या यासंदर्भातील आकडेवारी समोरही आली आहे. 

मोठ्या संख्येनं भारतीय सोडणार देश... 

एका अहवालातून समोर आलेल्या संभाव्य आकडेवारीनुसार 2023 या वर्षअखेरीपर्यंत मोठ्या संख्येनं श्रीमंत व्यक्ती भारत सोडून परदेशाची वाट धरणार आहेत. भारतच नव्हे तर, चीनमधूनही मोठ्या संख्येनं नागरिक इतर देशांमध्ये जाणार असून चीन या यादीच पहिल्या क्रमांकावर तर, भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगण्यात येत आहे. इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे देशातील धनाढ्य मंडळी परदेशात स्थायिक होण्यामागचं नेमकं कारण काय? 

कारण समजून घ्या... 

हेनले प्रायवेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2023 या वर्षी कोट्यवींमध्ये वार्षिक उत्पन्न असणारे अर्थात 6500 हाय नेटवर्थ इंडिविजुअल्स म्हणजेच HNI देश सोडू शकता. 2022  मध्ये 7000 एचएनआय व्यक्तींनी भारतातून काढता पाय घेतला होता. मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा काही अंशी कमी असला तरीही ही घट समाधानकारक नाही हेच खरं. 

भारतात करप्रणाली आणि त्याच्याशी संहबंधित नियमांमध्ये सुसूत्रतेचा अभाव पाहता श्रीमंत व्यक्तींनी देशाबाहेरची वाट धरली आहे. करिअर आणि व्यवसायासाठी परदेशात चांगल्या संधी, परदेशातील जागतिक दर्जाचं व्यवस्थापन आणि प्रशासकीय कारभारात असणारी सुसूत्रता ही यामागची प्रमुख कारणं आहे. जगभरातील श्रीमंतांनी ऑस्ट्रेलिया, दुबई आणि सिंगापूरसारख्या देशांना पसंती दिली आहे. 

हेसुद्धा वाचा : बापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू 

 

फक्त भारत आणि चीनच नव्हे, तर रशिया, युके, ब्राझिल, हाँगकाँग, दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, जपान, व्हिएतनाम, नायजेरियातूनही अनेक नागरिक जगातील इतर देशांमध्ये संधीच्या शोधा स्थायिक होणार आहेत. यापैकी बहुतांशी धनाढ्य मंडळी ऑस्ट्रेलिया, युएई, अमेरिका, स्वित्झर्लंड, कॅनडा, ग्रीस, फ्रान्स, पोर्तुगाल, न्यूझीलंड, इटली यांसारख्या देशांमध्ये स्थायिक होण्याची शक्यता आहे. 

राहिला प्रश्न यापैकी अनेकांचीच पसंती ऑस्ट्रेलियाला का? तर, त्यामागे अनेक कारणं आहेत. ऑस्ट्रेलियातील हवामान, तिथले समुद्रकिनारे, तिथं असणाऱ्या संरक्षणात्मक सुविधा, उत्तमोत्तम आरोग्य सुविधा, उच्च राहणीमान, सुधारित शिक्षण व्यवस्था, करिअरच्या अनेक संधी, सोपी कररचना आणि भक्कम अर्थव्यवस्था या कारणांमुळं भारतीयांसह इतर देशांतील नागरिकही ऑस्ट्रेलियालाच पसंती देताना दिसत आहेत.