निकालांपूर्वीच दिल्लीत घडामोडी, महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडूंचा भेटीगाठीवर भर

लोकसभा निकालांपूर्वीच महाआघाडीची चाचपणी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बड्या नेत्यांच्या गाठीभेट घेत सुटले आहेत. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 19, 2019, 04:23 PM IST
निकालांपूर्वीच दिल्लीत घडामोडी, महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडूंचा भेटीगाठीवर भर title=

नवी दिल्ली : निकालांपूर्वीच महाआघाडीची चाचपणी दिल्लीत सुरु झाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बड्या नेत्यांच्या गाठीभेट घेत सुटले आहेत. आज दुसऱ्या दिवशीही त्यांनी हा गाठीभेटीचा सिलसिला कायम ठेवला आहे. त्यामुळे दिल्लीत निकालापूर्वीच सत्तेबाबत जुळवाजुळव होत असल्याच्या चर्चा झडत आहेत. त्याआधी महागठबंधनच्या नेत्या सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजेच २३ मे रोजी सर्वपक्षीय (भाजप विरोधी) नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याआधी चंद्राबाबूंकडून नेत्यांच्या गाठीभेटी होत असल्याचने मोठी चर्चा सुरु झाली आहे. चंद्रबाबू नायडू २४ तासांत दोनदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, लोकसभेत कोणालाच बहुमत मिळणार नाही, अशी शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. केंद्रातील मोदी सरकार सत्तेतून पाय उतार करण्यासाठी विरोधांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. तसेच या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, तर सत्तास्थापनेचा दावा करता यावा आणि रणनीती ठरलेली असावी या उद्देशातून चंद्राबाबू नायडू यांनी भेटीगाठीचा वेग वाढवला आहे. आज चंद्रबाबू नायडू संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सायंकाळी ५ वाजता भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Mamata holds seven-km march in Kolkata over desecration of Vidyasagar's statue

चंद्रबाबू नायडू यांनी काल शनिवारी भेटीगाठींचा सपाटा लावला होता. नायडू यांनी सकाळी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची सुमारे तासभर चर्चा झाली. बिगर भाजप सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल, यावर त्यांच्यात खल झाला. तसेच नायडू यांनी कम्युनिस्ट नेते डी. राजा आणि सुधाकर रेड्डी यांचीही भेट घेतली. 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी दोन्ही नेत्यांना केले. त्यानंतर त्यांनी शरद पवार आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांची भेट घेतली. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली आहे. त्यांना महाआघाडीत सामील होण्याची विनंती केली आहे. 

देशात सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात आहेत. तेथे कट्टर विरोधक बसपा नेत्या मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची आघाडी झाली आहे. त्यांच्याशी चंद्राबाबू नायडू यांनी चर्चा केली. दरम्यान, देवेगौडांनी आधीच काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. देवेगौडा यांनीही केंद्रात सरकार स्थापण्यासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विरोधकांच्या आघाडीत कोणताही बेबनाव निर्माण होऊ नये, नेत्यांनी वादग्रस्त आणि भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केले आहे.